<p><strong>नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :</strong></p><p>आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या डेल्टा रँकींगमध्ये शैक्षणिक विकासाच्या संदर्भात नंदुरबार जिल्हा दुसर्या क्रमांकावर आला आहे. </p>.<p>या चांगल्या कामगिरीबद्दल पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.</p><p>देशातील निवडक 112 आकांक्षित जिल्ह्यातून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मेघालय राज्यातील रिबोही जिल्ह्याच्या खालोखाल दुसर्या क्रमांकावर आहे. </p><p>छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर दंतेवाडा, तिसर्या, बस्तर चौथ्या आणि आसाममधील बक्सा जिल्हा पाचव्या स्थानावर आहे.</p><p> शिक्षण या उपक्रमांतर्गत एकूण 8 निर्देशांकापैकी शिक्षण विभागाने सर्वच बाबतीत चांगली कामगिरी केली आहे.</p>.<p>पाचवी ते सहावीतील संक्रमणदर 99.56 टक्के असून 8 वी ते 9 वी वर्गातील संक्रमणदर 93.33 टक्के आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून विद्यार्थी दूर जाणार नाही म्हणून वैयक्तिक लक्ष देण्याचे काम शिक्षण विभागाने केले आहे.</p><p>एप्रिल 2018 मध्ये 77.11 टक्के असलेल्या मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची संख्या जानेवारी 2021 मध्ये 92.93 टक्क्यांवर आली आहे. यासाठी आकांक्षित जिल्हा निधीतून 65 स्वच्छतागृहांचे काम पूर्ण करण्यात आले.</p><p>जिल्हा परिषदेच्या 506 शाळांची रंगरंगोटी करण्यात आली असून 148 वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. 60 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.</p><p>एकूण 156 शाळांमधील 315 वर्गखोल्यांचे निर्लेखन करून नवीन वर्गखोल्या बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.</p><p>जिल्हा परिषदेच्या 315 शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. 384 शाळांमध्ये सोलर डिजीटल यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.</p>.<p>15 ते 45 वयोगटातील स्त्री साक्षरतेसंदर्भात एप्रिल 2018 मध्ये 46.10 असणारे प्रमाण जानेवारी 2021 मध्ये 81.81 टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि विद्युत पुरवठ्याची सुविधा करण्यात आली आहे.</p><p>विद्यार्थी-शिक्षक संदर्भात असलेले 93.15 टक्के प्रमाण जानेवारी 2021 मध्ये 98.78 टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानीत शाळांमधील 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.</p><p>शैक्षणिक क्षेत्रात अधिक चांगली प्रगती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दुर्गम भागातील शाळांमध्ये अधिक चांगल्या सुविधा करण्याचे निर्देश दिले आहेत.</p><p>अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. शिक्षण विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचेदेखील मार्गदर्शन लाभले आहे.</p><p>निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीदेखील जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.</p>