नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :
अक्कलकुवा तालुक्यातील डोडवा फाट्यावर भरधाव वेगातील कार व मोटारसायकल यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील तिघे ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. काल देि. १६ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रंग- शेवाळी महामार्गावर काल दि. १६ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास
महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या डोडवा फाट्याजवळ स्वागत हॉटेलसमोर गुजरात राज्यातील चिकालीकडून (ता.सागबारा, जि.नर्मदा) महुपाडा येथे मोटरसायकल (क्र.एम.एच.१९ बी.बी.५३०४) ला गुजरात राज्यातील सातबाराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार ( क्र.एम.एच. ४३ बी.यु.८१६२) ने धडक दिली.
या अपघातात मोटरसायकलवर असलेले मोहन कडू मोरे (वय २५), रोहित कैलास मोरे (वय १०), कुणाल एकनाथ मोरे (वय १०) हे तिघे ठार झाले असून मुक्ताबाई एकनाथ मोरे (वय ३५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. चौघे जण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कडगाव येथील रहिवासी आहेत. ते सध्या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील चिकालीफाटा येथे वास्तव्यास होते.
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खापर पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. याबाबत कारचालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर करीत आहेत.