संचारबंदी कालावधीत 1 जूनपर्यंत वाढ

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 1 पर्यंत सुुर राहणार
संचारबंदी कालावधीत 1 जूनपर्यंत वाढ
USER

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग तसेच ब्रेक द चेन अंतर्गत सुधारीत सूचना व शासनाकडील वेळोवेळी शिथिल निर्बंध आणि मुभा देण्यात आलेल्या बाबीं संदर्भातील आदेश कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात 15 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीची मुदत वाढविण्याचे निर्देशीत केले आहे.

दरम्यान, संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. अन्य राज्यातून जिल्हयात प्रवेश करणार्‍या नागरिकांना 48 तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक असेल.

मालवाहतूक करणार्‍या वाहनात चालक आणि मदतनीसासह एकूण 2 व्यक्तींना परवानगी असेल. अन्य राज्यातून जिल्हयात प्रवेश करणार्‍या वाहनातील वाहनचालक व मदतनीसाला 48 तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक असेल. हा अहवाल 7 दिवसासाठी ग्राह्य असेल.

दूध संकलन, वाहतूक आणि प्रक्रीयेसाठी कुठल्याही बंधनाशिवाय परवानगी असेल. तथापि दूध विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत घरपोच दूध विक्रीस मुभा असेल. जिल्यात्तील बहुतांशी नागरीक सातुड्याच्या डोंगराळ भागात रहात असल्याने त्यांना तालुक्यातील बाजाराच्या ठिकाणी सकाळी 11 पूर्वी येणे शक्य होत नाही. त्यामुळे काही बाबींसाठी मुभा देण्यात आली आहे.

कृषि अवजारे आणि कृषि उत्पादने यांच्याशी संबंधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, इलेक्ट्रीक मोटार व ट्रॅक्टरची खरेदी आणि दुरुस्ती इ.) आणि कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.

जिल्हयातील किराणा, भाजीपाला, फळे, मिठाई, बेकरी आणि सर्व प्रकारचे खाद्यान्न (अंडी, चिकन,मटन, मासे, पालेभाज्या) दुकाने व पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने, वीज, पाणी, गॅस वितरण, वृत्तपत्र छपाई व वितरण आदी अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ सुरू राहतील.

वरील ठिकाणी कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कार्यप्रणालीचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापना मालक, संस्था चालक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येऊन सदर दुकान किंवा आस्थापना संचारबंदी कालावधीपर्यंत सील करण्यात येईल. जिल्ह्यात आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी पूर्णत: संचारबंदी लागू असून वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, पाणी, विद्युत, गॅस वितरण, दुध विक्रेता, वृत्तपत्र छपाई व वितरणास मुभा राहणार आहे. कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com