जिल्ह्यासह राज्यात करोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजविला होता. दररोज हजारोच्या संख्येत रुग्ण वाढ होत असतांना मृत्यू होणार्यांची संख्या कमी होत नव्हती.
त्यातच काही रुग्णांना ऑक्सिजनचा बेड मिळत नव्हता तर अनेकांची रेमडीसिवीरसाठी वणवण भटकावे लागत होते. मात्र गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड घट झाली असून रुग्ण संख्या आटोक्यता आली आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुके हे करोनामुक्त झाले असून केवळ बोटावर मोजण्या इतके गावे देखील आता कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. अशी पस्थिती असतांना प्रशासनाकडून तिसर्या लाटेचा धोका असल्याचे वारंवार सांंगितले जात आहे.
सद्याच्यास्थितीत जिल्ह्यातील रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करुन नियम पाळणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. मात्र लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याने आठवड्यातून दोन-तीन दिवस शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत असल्याची नामुष्की प्रशासनावर येत आहे.
यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने देशात कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता नुकतीच वर्तविली त्याच भारतात केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने केंद्र शासनाने देखील चिंता व्यक्त केली आहे.
यातच प्रत्येक जिल्ह्यात केंद्राकडून हवेतून ऑक्सिजन निमिर्तीचे प्लॅन्ट तयार करण्यात आले आहे. एकीकडे प्रशासनाकडून तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेला बळकट करीत आहे.
तर दुसरीकडे नागरिक रुग्ण संख्या कमी होताच बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहे. यातच आता पावसाळ्यात वातावरणातील बदलामूळे साथीच्या आजारांसह थंडी-तापासह सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
त्यामुळे शहरातील गल्लीबोळांसह स्पेशलीस्ट रुग्णालये गर्दीने फुल्ल झाले असल्याचे चित्र दिसून येत असल्याने फिजिशीयन डॉक्टरच या रुग्णांवर उपचार करुन त्यांना ठणठणीत करीत आहे.
त्यामुळे नागरिकांनी तीन चार दिवसांपेक्षा अधिक काळ फल्यूची लक्षणे असल्यास नागरिकांनी तात्काळ चाचणी करुन उपचार केल्यास तिसर्या लाटेचा थोपविण्यात प्रशासनाला नक्कीच यश येईल.