अज्ञात रुग्णाच्या मृत्युस कारणीभूत कोण ?

ग्रामीण रुग्णालयात झाले होते उपचार : रुग्ण हरताळा परिसरात पोहचला कसा ?
अज्ञात रुग्णाचे केस कापून नवे कपडे देताना पोलीस कर्मचारी इन्सटमध्ये मृत रुग्ण
अज्ञात रुग्णाचे केस कापून नवे कपडे देताना पोलीस कर्मचारी इन्सटमध्ये मृत रुग्ण

वरणगाव - भुसावळ - वार्ताहर - Bhusawal :

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गावाजवळ शुक्रवारी पुलालगत ५५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे सदरच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत माहिती अशी की, मृत्यू झालेला व्यक्ती हा पंधरा दिवसापासून वरणगाव परिसरामध्ये होता ६ नोव्हेंबरच्या आसपास तो वरणगाव परिसरात आलेला होता.

९ नोव्हेंबर रोजी बस स्टँड चौकामध्ये तो फिरत असताना पोलीस स्टेशनतर्फे काही पोलिस अधिकार्‍यांनी स्वखर्चाने त्यास नवे कपडे घातलेले होते.

तसेच त्याला वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तीन चार दिवसानंतर हा व्यक्ती ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर बरेच दिवस भिंतीजवळ पडलेला आढळला असल्याचे समजते.

त्यानंतर १८ रोजी सदर व्यक्ती अर्धवट कपडे घातलेल्या परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात पडलेला होता. ही व्यक्ती अनेक दिवसांपासून भुकेला असल्याचे दिसत होते तसेच याच दरम्यान, परिसरातील काही नागरिकांनी त्यास पाणी, कोल्ड्रींक्स आणून दिला होता.

त्याच्या अंगावरची चादर सुद्धा एका व्यक्तीने दिलेली होती. या व्यक्तीला जळगाव सरकारी दवाखान्यात नेण्यासाठी काही नागरीकांनी सांगितले असता वैद्यकीय अधिकारी सदर व्यक्तिस जळगाव येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात तयार होते.

परंतु त्यांना पोलिसांतर्फे पाठवावे अशी सांगण्यात आले. पोलिसांना फोन लावला असता पोलीस स्टेशनकडे कर्मचारी संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले. आणि सदर व्यक्ती या दवाखान्यात पोलिसांमार्फत जळगाव रुग्णालयात जायला हवे असे सांगितले होते.

त्यानंतर गुरुवारी या व्यक्तीस जळगाव जाण्यासाठी १०८ नंबर ची म्बुलन्स निघाली आणि त्यानंतर दुसर्‍याच दिवशी हा व्यक्ती हरताळा पुलाजवळ मृत पडलेला आढळला आहे.

सदर अज्ञात व्यक्तीस कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही, यावर जळगाव येथे सिविल हॉस्पिटल येथे उपचाराला का रवाना केले नाही ? का तिथपर्यंत तो पोहोचलाच नाही ? याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे.

तरी या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत कोण? याबाबत वरणगाव परिसरात चर्चा सुरू आहे. पोलीस आणि रुग्णालय यांच्या वादात सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.

तरी शासकीय यंत्रणेला परिसरातील जनता प्रश्न विचारत आहे. वरणगाव मधील माणुसकी संपली काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अज्ञात व्यक्ती असल्यास त्याबाबत त्याच्या जिविताची हमी कोण घेत आहे याबाबत सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितावर कारवाई व्हावी असे परिसरात बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com