जळगाव | प्रतिनिधी Jalgaon
मेहरुण तलावाच्या काठावर हातपाय धूत असताना पाय घसरल्यामुळे समतानगरातील एक तरुण बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाण्यात बुडाला. त्याचा शोध घेण्याचे काम महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक आणि पोलीस व काही तरुण दुसऱ्या दिवशीही करीत आहेत.
समतानगरातील साईनाथ शिवाजी गोपाळ (वय २२) हा तरुण मित्रांसोबत मेहरुण तलावाच्या परिसरात बुधवारी दुपारी फिरण्यासाठी गेला होता. सायंकाळी घराकडे परतत असताना तो तलावाच्या काठावर हातपाय धुण्यासाठी गेला, हातपाय धूत असताना पाय घसरल्याने तो तलावाच्या पाण्यात पडून बुडाला. हा प्रकार लक्षात येताच सोबतच्या मित्रांनी साईनाथच्या घरी व इतरांना कळविले.
याबाबत माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साईनाथचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ व बहिण असा परिवार आहे.