आषाढीला श्री त्रिविक्रमाचे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार

३५० वर्षांची परंपरा प्रथमच खंडित होणार
आषाढीला श्री त्रिविक्रमाचे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार

शेंदुर्णी ता. जामनेर - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 350 वर्षांची परंपरा खंडीत होणार असून आषाढी एकादशिला भगवान श्री त्रिविक्रम महाराजांचे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच, पाच दिवस शहर बंद राहणार आहे. शांतता कमीटीच्या बैठकीत सर्व पक्षीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

आषाढीच्या पार्श्वभूमीवर दि.24 जुन रोजी येथील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयामध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीस मुख्याधिकारी साजीद पिंजारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, राष्ट्रवादी कार्यकर्ते योगेश गुजर, धिरज जैन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रविंद्र गुजर, हभप कोडोबा गुजर, पंडीत जोहरे, नगरसेवक राहुल धनगर, संत श्री कडोजी महाराज संस्थानतर्फे हभप तुषार भगत, त्रिविक्रम मंदीर संस्थानतर्फे भोपे, सामाजिक कार्यकर्ते रजनिकांत शुक्ला, पत्रकार उपस्थीत होते.

दर्शनाची परंपरा खंडीत होणार

350 वर्षांपासून प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविक एक दिवस आधीपासुनच आषाढीनिमित्त येतात.ठराविक लोकांच्या

उपस्थितीत होणार पुजाविधी

आषाढी एकादशीला आदल्या दिवशी मध्यरात्री भगवान श्री त्रिविक्रमाच्या मुर्तीची ठराविक लोकांच्या उपस्थीतीत विधीवत शास्रोक्त मंत्रोपचाराने पुजाअर्चा होणार आहे. मात्र भाविकांना दर्शन घेता येणार नाही . तसेच, दिवसभराचे कार्यक्रम दिंडी, किर्तन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

मंदीर परीसर सील होणार

कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये आणि दर्शनासाठी येऊ नये यासाठी एक दिवस आधीच बॅरेकेटींग लावून परीसर चोहोबाजुंनी सील करण्यात येणार आहे. तसेच, याबाबतचे फलक मंदीर परीसरामध्ये लावण्यात येत आहे. नगरपंचायततर्फे भाविक भक्तांना आवाहन करण्यासाठी माहिती पत्रके, बॅनर, आणि रिक्षा द्वारे आसपासच्या गावांमध्ये दिवंडी दिल्या जाणार आहे. या प्रकारच्या उपाययोजना कारण्यात येणार आहे.

पाच दिवसांचा जनता कर्फ्यू

कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता आणि बाजारपेठांमधील वाढती गर्दी बघता पाच दिवसांचा जनताकर्फ्यु पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. दि.28 जुन ते 1 जुलै दरम्यान जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी जाहीर केले.

शासनातर्फे आलेल्या सुचनांचे पालन होत असुन त्यानुसार आषाढी एकादशीला भाविक भक्तांनी नगरपंचायतीस सहकार्य करावे . तसेच, सदर निर्णय हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांच्या हिताचा असुन घरीच राहुन आपण भाक्ती भावाने आषाढी एकादशी साजरी करुया आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करावे.

साजीद पिंजारी, मुख्याधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com