दिग्विजय सूर्यवंशी
शेंदुर्णी ता.जामनेर
करोनाच्या प्रादुर्भावामुळे ३५० वर्षांची परंपरा खंडीत होणार असून आषाढी एकादशिला भगवान श्री त्रिविक्रम महाराजांचे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद राहणार आहे.
पाच दिवस गाव राहणार बंद
शांतता कमीटीच्या बैठकीत सर्व पक्षीय आणि सामाजिक कार्यकर्ते मिळून हा निर्णय झाला आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर दि.२४ जून रोजी येथील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयामध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीस मुख्याधिकारी साजीद पिंजारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, राष्ट्रवादी कार्यकर्ते योगेश गुजर, धिरज गुजर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रविंद्र गुजर, कोडोबा गुजर, पंडीत जोहरे, नगरसेवक राहुल धनगर, संत श्री कडोजी महाराज संस्थानतर्फे तुषार भगत, त्रिविक्रम मंदीर संस्धान तर्फे भोपे, सामाजिक कार्यकर्ते रजनिकांत शुक्ला पत्रकार आदि मान्यवर उपस्थीत होते.
परंपरा खंडीत होणार ! साडे तीनशे वर्षांपासून प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविक एक दिवस आधीपासुनच आषाढीनिमित्त दर्शनासाठी येत असतात. एका अख्यायीकेनुसार आषाढी एकादशीला भगवान श्री विठ्ठल हे भगवान श्री मूर्तीमध्ये व्यास करीत असल्याने ज्या भाषिकांना पंढरपुर जाणे शक्य होत नाही ते भाविक येथे दर्शनासाठी येथे येत असतात. तसेच आसपासच्या गावांमधून दिंड्या पालख्या मोठ्या संख्येने येतात. परंतु, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे. पाहिल्यांदाच आषाढीला दर्शनासाठी मंदीर बंद रहाणार आहे.