जळगाव - Jalgaon
एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बसला लालपरी म्हटलं जातं मात्र काळ बदलला पण या लालपरीची अवस्था अजूनही अत्यंत दयनीय अशीच आहे. जामनेर ते कापूसडी दरम्यानच्या प्रवासात बस संपूर्णपणे गळत असल्याने पावसाच्या पाण्यात बसमधील प्रवासी पूर्ण ओलेचिंब झाले असल्याचा प्रकार आज समोर आला. त्यामुळे ही लालपरी की जलपरी असाही आश्चर्यकारक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. जामनेर डेपोच्या कपास वाडी जाणारी बस आल्यानंतर पाऊस असल्यामुळे साहजिकच प्रवासी बसमध्ये बसले. मात्र ही बस संपूर्णपणे गळत असल्याने बसमध्ये बसल्यानंतरही प्रवाशांना ओलं चिंब भिजण्याची वेळ आली.
एसटी महामंडळाच्या जीर्ण झालेल्या बसेसमध्ये खडखड दडदड चा त्रास तर नेहमीच असतो. मात्र याच बसमधून भिजत भिजत प्रवास करण्याचा आश्चर्यकारक अनुभवही आज प्रवाशांनी घेतला. आपणास एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असलो तरी मात्र आपण जिला लालपरी म्हणतो तिची अवस्था मात्र अजूनही पारतंत्र्यात असल्याप्रमाणे दयनीय अशीच आहे. कधी सुधरतील या बसेस आणि कधी होईल नागरिकांचा सुखरूप व सुरक्षित प्रवास हा प्रश्न मात्र सध्यातरी अनुत्तरित आहे.