जळगाव - Jalgaon
शहरातील गजानन हॉस्पिटल येथे काल शनिवारी तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील चावदस शंकर ताडे वय ५५ यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास प्रकृती ठिक होती. यावेळी ते नातेवाईकांशी बोलले. यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयातील कर्मचार्यांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनसह डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चावदस ताडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी करत रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान याबाबत गजाजन हॉस्पिटलचे डॉ. विवेक चौधरी यांनी मात्र कुठल्याही हलगर्जीपणामुळे अथवा इजेंक्शन दिल्यामुळे हा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली आहे. १५ दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवरच होते. आज त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले.
शिरसोली प्र.न. येथील चावदस शंकत ताडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ११ एप्रिल रोजी जळगाव शहरातील आशिर्वाद हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. काल शनिवारी संध्याकाळी ७ वाजता ताडे यांची प्रकृती खालावल्याने तसेच त्यांना मोठया व्हेंटीलेटरची आवश्यकता असल्याने गजानन हॉस्पिटल येथे हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना आशिर्वाद हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला. त्यानुसार नातेवाईकांनी त्यांना पांडेचौकाजवळील गजाजन हॉस्पिटल येथे दाखल केले.
याठिकाणी आज सकाळी ताडे नातेवाईकांशी बोलले, चहा मागितली. तसेच नातीची भेट घ्यावयाचे असल्याचे सांगत तिला भेटायला घेवून असे चांगल्या पध्दतीने बोलले. यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास ताडे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. यावेळी जिल्हापेठ पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तसेच त्यांच्या कर्मचार्यांनी कुठलेतरी इंजेक्शन दिल्याने त्याच्या हाय पॉवरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चावदस ताडे यांचे भाऊ तथा शिरसोली येथील विद्यमान उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. तसेच कारवाईची मागणी केली.