जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसात सलगच्या अपघातांच्या घटनांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला,यात तरुणांचाही समावेश आहे.
या गंभीर बाबीची दखल घेत काय उपायोजना करता येतील, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज शनिवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण विभागाचे अधिकारी तसेच कंत्राटदार, वाहतूक शाखेचे पोलीसस निरिक्षकांना यांच्यासोबत पाहणी केली.
जळगाव शहरातून गेलेल्या पाळधी ते नशिराबाद या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसात अपघाताची संख्या वाढली. गुजराल पेट्रोल पंपाजवळ बापलेक ठार झाले तर दूरदर्शन टॉवरजवळ तरुणाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी देखील अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला असून यात तरुणांचा समावेश ही चिंतेची बाब बनली आहे.
जळगाव शहर व परिसरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील शिव कॉलनी व तरसोद फाटा या दोन्ही ठिकाणी डॉ.मुंढे व सिन्हा यांनी भेट दिली. दरम्यान, जेथे गरज आहे तेथे दुभाजक तयार करणे, गतिरोधक, वळण रस्ता, धोकेदायक ठिकाण यासह वाहतूक नियमांचे फलक लावण्याचे नियोजन करण्यात आले.
तातडीने आवश्यक असलेल्या ठिकाणी महामार्गावर पोलीस दलाचा निधी खर्च केला जाईल, जास्त तसेच अधिकार क्षेत्राच्या बाहेर खर्च करावा लागत असेल तर जिल्हाधिकार्यांकडे बैठक घेऊन हे विषय मार्गी लावले जातील, असे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बोलतांना सांगितले.