बोदवड महाविद्यालयाला स्वच्छता कार्यरत संस्थेची मान्यता

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय
बोदवड महाविद्यालयाला स्वच्छता कार्यरत संस्थेची मान्यता

बोदवड । प्रतिनिधी Bodwad

भारत सरकारची स्वच्छता अभियान ही मोहीम सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. जनतेत स्वच्छते प्रति जनजागृती निर्माण करण्यासाठी या योजनेची सुरुवात शासनाने केली आहे.

स्वच्छता ही केवळ आपल्या घरापुरती मर्यादित न ठेवता देशालाही स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंतीनिमित्त दि.2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरु केली आहे. त्यांनी देशातील सर्व लोकांना एकत्र करुन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे ब्रिटिशांनी भारत सोडायला सांगीतले. तसेच सर्व भारतीयांना स्वच्छ भारत ठेवण्याचा मंत्र दिला. महात्मा गांधीजीनी त्यावेळी जनतेला प्रेरित केले. परंतु स्वच्छ भारत हे त्यांच स्वप्न अपूर्ण राहीले. त्यांचे स्वप्न सर्व भारतीयांनी पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. महाविद्यालयात स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी शासन प्रोत्साहन देते.

त्यातलीच एक योजना स्वच्छता कार्यरत संस्था म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद, उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन मंत्रालय व आताचे शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या योजनेंतर्गत कोविड-19 या उद्भवलेल्या महामारीनंतर महाविद्यालयाने केलेल्या तयारीचा उल्लेख केलेला होता. त्या योजनेचे पाच विभागात सॅनिटायझेशन व हायजीन, वॉटर मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, एनर्जी मॅनेजमेंट व ग्रीनरी असे विभाजन करण्यात आलेले होते.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवडचे प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी व उपप्राचार्य प्रा.डी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ.क्यू.ए.सी. समन्वयक तथा रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिल बारी यांनी सदर योजनेचा प्रस्ताव व पाचही विभागात महाविद्यालयाने राबविलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल क्षणचित्रासह व नियोजन, स्वतंत्र समिती स्थापना तसेच कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या उपाययोजनाचा प्रामुख्याने उल्लेख करून महाविद्यालयाने प्रस्तावाच्या स्वरुपात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद, उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन मंत्रालय व आताचे शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांना सादर केला.

या योजनेचे समिती अध्यक्ष प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी आहेत. तर सदस्य म्हणुन डॉ.अनिल बारी, डॉ.रुपाली तायडे, सौ. कंचन दमाडे, नितेश सावदेकर व डॉ.गीता पाटील यांची नियुक्ती केलेली आहे. महाविद्यालयाने कोरोना विषाणू (कोविड-19) संसर्ग पार्श्वभूमी विचारात घेता साथरोग प्रतिबंधक नियमांचे व वेळोवेळी शासन, विद्यापीठ व स्थानिक प्रशासन यांचे निर्देश पाळत असल्याचे सुद्धा त्यामध्ये उल्लेख होता.

संस्थेने महाविद्यालयाची उलटतपासणी करून त्याची सत्यता पडताळणी करून महाविद्यालयास अ‍ॅक्शन प्लॅन इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता दिली. डॉ.वी.जी. प्रसन्ना कुमार चेअरमन यांच्या स्वाक्षरीचे मान्यतेचे प्रमाणपत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले.अ‍ॅक्शन प्लॅन इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत संस्थाध्यक्ष मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा व सर्व संचालकांनी केले, असे प्रसिद्धीप्रमुख जितेंद्र शर्मा यांनी कळविले आहे.

महाविद्यालय व परिसर स्वच्छतेसाठी प्रारंभापासूनच कार्यरत आहे व प्राधान्य दिले आहे. स्वच्छतेसाठी आम्ही सर्वच झटत आहेत. स्वच्छ महाविद्यालय म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत महाविद्यालयस्तरीय कोरोना प्रतिबंधक, स्वच्छता व व्यवस्थापनापसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांना भारत सरकारने मान्यता देणे हे अभिमानास्पद बाब आहे.

- प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com