शिवजयंतीसाठी लाख गुन्हे अंगावर घेईन-आ.चव्हाण

गुन्हा दाखल झाल्यानतंर आमदारांची प्रतिक्रिया
शिवजयंतीसाठी लाख गुन्हे अंगावर घेईन-आ.चव्हाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या हजारोंच्या सभा होत असताना दुसरीकडे मात्र शिवजयंती साजरी करण्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध सरकारने घातले होते. काल दि.१९ रोजी सरकारच्या तुघलकी निर्बंधाना झुगारत चाळीसगाव येथे शिवप्रेमींनी काढलेल्या मिरवणुकीत सहभागी होत त्यांचा उत्साह वाढविला.

मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक येताच, या मिरवणुकीला अडविण्याचे पाप सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी केले. आजपर्यंत महाराष्ट्रात तरी शिवजयंती मिरवणूक यापूर्वी कधीच अडविण्यात आली नाही. पोलिसांनी मिरवणूक अडविल्यानंतर मोठी संतापाची लाट शिवभक्तांमध्ये निर्माण झाली होती.

आम्ही शिवरायांना आदर्श मानणारे कायदा पाळणारे शिवभक्त आहोत. मात्र पोलिसांच्या आडकाठी मुळे शिवभक्त व पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी उपस्थित सर्व शिवप्रेमींची समजूत घालत, त्यांना मिरवणूक थांबविण्याची विनंती केली. त्यानंतर शांततापूर्ण पद्धतीने शिवप्रेमी तरुणांनी मिरवणूक संपवली. मात्र पोलिसांनी आज दि.२० रोजी माझ्यासह १५० शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले असल्याचे मला कळाले.

राज्यात मुघलांच्या वंशजांचे सरकार आहे की काय ? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. शिवरायांसाठी असे एकच काय तर एक लाख गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार असल्याची प्रतिक्रिया देशदूतशी बोलतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. पुढे राष्ट्रवादीच्या संवाद यांत्रेवर टिका करतांना ते म्हणाले की,राष्ट्रवादीची परिवरसंवाद यात्रा, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा, कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्या पदग्रहण सोहळा यासाठी हजारोंची गर्दी केली तरी कोरोना होत नाही. मात्र शिवजयंती साठी एकत्र आल्यानेच कोरोना पसरतो असा जावईशोध या तीन तिघाड्या सरकारने लावला आहे.या सरकारने जो दुजाभाव शिवजयंती बाबत केला आहे तो शिवप्रेमी कधीच विसरणार नाही हेही त्यांनी लक्षात घ्यावा असेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com