<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले वादग्रस्त अतिक्रमण पदाधिकारी, अधिकार्यांसह पोलीस बंदोबस्तात आज सकाळच्या सुमारास हटविण्यात आले. दोन्ही अतिक्रमण हटविल्याने ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.</p>.<p>शहरातील गणेश कॉलनीतील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून नगरसेविका दीपमाला काळे यांनी केली होती. </p><p>यासाठी काळे यांनी महापालिकेत आंदोलन देखील केले होते. दरम्यान, अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा होऊन नागरिकांना रहदारीस अडथळा होणार नाही याबाबत समाज बांधवांना विश्वासात घेऊन गुरुवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात आले. </p><p>सकाळी 5.30 वाजताच महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मनोज काळे पोलीस फौजफाट्यासह पोहचले.</p>.<p><strong>पोलिसांचा तगडा बंदोबस्त</strong></p><p>गणेश कॉलनीतील ख्वॉजामियाँ दर्ग्याच्या बाहेर असलेले जुने लोखंडी गेट देखील मनपाने महापौरांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.</p><p><strong>अन् लागलीच रस्त्याच्या कामाला सुरुवात</strong></p><p>शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ते वादग्रस्त अतिक्रमण काढल्यानंतर मनपाकडून तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे या परिसरात या अतिक्रमणामुळे होणारी वाहतुकीची कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच हे अतिक्रमण काढल्यामुळे शहरातील या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.</p>