<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जळगाव शहरातील विविध विकास कामांसाठी महापालिकेच्या सत्ताधार्यांनी निधीसाठी प्रस्ताव दाखल केला होता.</p>.<p>त्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास 50 कोटींच्यावर निधी मंजूर झाला आहे.</p><p> जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याचा दावा ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला आहे.</p><p>महानगरपालिकेत अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या वार्डात विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक करत होते. </p><p>त्यामुळे 15 नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी या प्रमाणे 15 कोटींचा निधी मिळण्यासाठीदेखील पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. </p>.<p>त्या अनुषंगाने प्रस्तावदेखील देण्यात आला होता. दरम्यान, भाजपचे 27 बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपकडून सत्ता जावून शिवसेनेच्या हातात महापालिकेची सत्ता आली.</p><p>दरम्यान, शहरातील विकासकामांसाठी सत्ताधार्यांनी तीन दिवसांत प्रस्ताव तयार केले. प्रस्तावाला तांत्रिक मान्यता घेवून ते जिल्हा प्रशासनाकडे पाठविले.</p><p>दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे सुमारे 50 कोटींच्यावर निधी मंजूर झाला आहे. मनपाच्या इतिहासात जिल्हा नियोजन समितीकडून एवढा मोठा निधी पहिल्यांदाच मंजूर झाल्याची चर्चा आहे.</p><p>याबाबतचे पत्र देखील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांना प्राप्त झाले आहे.</p>