जिल्ह्यात आतापर्यंत २१ बाधितांच्या मृत्यूचा उच्चांक

९८४ नवे बाधित तर १ हजार १९५ रुग्ण करोनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत २१ बाधितांच्या मृत्यूचा उच्चांक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील करोनामुळे मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात कोरानामुळे जिल्ह्यात तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतच्या काळात ही सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आज झाली आहे.

तसेच कोरोनाचे ९८४ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर १ हजार १९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मृत्यू होणार्‍यांमध्ये सर्वाधिक ७ रुग्ण जळगाव शहरातील आहे.

जिल्ह्यात आज १४ एप्रिल रोजी दिवसभरात ९८४ नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या १ लाख ५ हजार १३६ एवढी झाली आहे .

दुसरीकडे १ हजार १९५ करोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही ९१ हजार ६९९ इतकी झाली आहे.

यात जळगाव शहर २११, जळगाव ग्रामीण ७५, भुसावळ ७८, अमळनेर ३७, चोपडा १२, पाचोरा १७, भडगाव ३४ धरणगाव ४६, यावल ६७, एरंडोल ७३, जामनेर २०, रावेर ८६, पारोळा ६, मुक्ताईनगर १५८, चाळीसगाव ५९ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकूण ९८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव शहरात मृत्यूचे तांडव

बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल २१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव शहरातील ७, जळगाव तालुका, धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी ३, चोपडा तालुक्यातील दोन तर जामनेर, रावेर, भुसावळ, पाचोरा, एरंडोल, अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यूह होणार्‍यांची संख्या ही १ हजार ८४८ इतकी झाली असल्याने जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरुच आहे.

बाधितांपेक्षा करोनामुक्त होणारे अधिक

गेल्या दिड महिन्यापासून शहरात बाधितांचा आकडा दररोज हजारांपेक्षा अधिक येत आहे. परंतु आज बाधितांची संख्या हजाराच्या आत म्हणजेच ९८४ इतकी आली आहे. दिवसभरात १ हजार १९५ कोरोनामुक्त झाले आहेत.

त्यामुळे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या वाढल्याने तसेच बाधितांचेही प्रमाण कमी झाल्यामुळे दिलासादायक बाब मानली जात आहे. मात्र मृत्यूचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढू लागली आहे.

प्रलंबित अहवालांचा आकडाा २ हजार ६०० च्या पार

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे.

परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे २ हजार ६१४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com