जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या मुख्य संशयित जितेंद्र कंडारेच्या वाढीव पोलीस कोठडीची मुदत सोमवार 12 जुलै रोजी संपली.
त्याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात प्रसिध्द असलेल्या पुण्यातील येरवडा तुरूंगात कंडारेची रवानगी करण्यात आली.
पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात बीएचआर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहेत. या गुन्ह्यात सात महिन्यानंतर फरार असलेल्या मुख्य संशयित जितेंद्र कंडारेच्या 28 जून 2021 रोजी पुणे आर्थिक शाखेच्या पथकाने इंदोरमधून मुसक्या आवळल्या. त्याला 9 जुलैपर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान पोलीस कोठडीत त्याच्याकडून गुन्हयासंदर्भातील माहिती तसेच कागदपत्रे संकलित करण्याचे काम पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. संशयित जितेंद्र कंडारे याला सोबत पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक 5 जुलै रोजी जळगाव आले होते.
चौकशीत एमआयडीसीतील बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात तळमजल्यावर कंडारेने लपविलेल्या 25 फाईल्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. शुक्रवार 9 जुलै रोजी कंडारेच्या पोलीस कोठडीची मुुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने कंडारेस 12 जुलै पर्यंत आणखी तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली होती. एकूण 14 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवार 12 जुलै रोजी कंडारेला पुणे येथील न्या.एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. गोसावी यांनी कंडारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले.
11 जणांच्या जामीनाच्या निकालावर 14 रोजी कामकाज
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 17 जून रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील भागवत भंगाळे , प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला रा. जळगाव, जयश्री शैलेश मणीयार रा. पाळधी, जयश्री अंतिम तोतला रा. मुंबई, जितेंद्र रमेश पाटील रा. जामनेर, आसिफ मुन्ना तेली रा. भुसावळ, छगन शामराव झाल्टे रा. जामनेर, राजेश शांतीलाल लोढा रा. तळेगाव ता. जामनेर, यांच्यासह प्रितेश चंपालाल जैन रा. धुळे, अंबादास आबाजी मानकापे रा. औरंगाबाद या 11 जणांना अटक केली होती. या सर्व संशयितांनी जामीनासाठी पुणे येथील न्यायालयात अर्ज दाखल केले आहे.
या जामीनअर्जावर युक्तीवाद पूर्ण झाला आहे. 14 जुलै रोजी सर्वांच्या जामीनाच्या निकालावर कामकाज होणार आहे. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. प्रविण चव्हाण हे काम पाहत आहेत.