<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असल्याने रेल्वेतून पडून पाय गमविलेल्या जगन चंद्रकांत पाटील (वय 30) रा. समतानगर या तरुणाला रेल्वेकडून तीन लाखाची नुकसान भरपाई देण्यात आली.</p>.<p>शहरातील समता नगरातील रहिवासी जगन पाटील हे 30 डिसेंबर 2012 रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव ते कोपरगाव दरम्यान प्रवास करीत होते.</p><p> चाळीसगाव स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून कापला गेला. या अपघातानंतर त्यांच्यावर चाळीसगावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.</p><p> उपचाराअंती त्यांचा पाय गुडघ्यापासून खाली पुर्णपणे कापण्यात आला. रेल्वे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करीत अहवाल सादर केला होता.</p>.<p><strong>तिकीट असल्याने मिळाली भरपाई</strong></p><p>जगन पाटील यांच्याकडून प्रवासाचे तिकीट देखील मिळुन आले होते. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर पाटील यांनी मुंबईच्या रेल्वे क्लेम ट्रीब्युनलकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. सुनावणीअंती 8 वर्षानंतर न्यायालयाने पाटील यांना 3 लाख 20 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली.</p><p>क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांमुळेच घडला अपघात</p><p>जगन पाटील हे प्रवास करीत असलेल्या दिवशी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये क्षमतेपक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. गाडीत गर्दी झालेली असल्यामुळेच पाटील हे खाली पडले. त्यामुळे त्यांना 4 लाख रुपयांची भरपाई द्यावी असा युक्तीवाद पाटील यांचे वकील अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांनी केला होता. सुनावणीअंती 3 लाख 20 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली.</p>