जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कर्मचार्यांच्या हजेरीसाठी आधार कार्ड अटेंडन्स सिस्टीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीतील प्रत्येक कर्मचार्याचा येण्याचा आणि जाण्याची वेळ नोंद केली जाणार असल्याने कामचुकार कर्मचार्यांना वचक बसणार आहे.
तसेच जिल्हा परिषदेतील कामाची पातळी सुधारेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आधार अटेंडन्स सिस्टीम हे मंत्रालया नंतर पहिल्यांदा जिल्हा परिषद जळगाव येथे राबविण्यात येणार आहे. ही सिस्टीम अगदी ग्रामपंचायत लेव्हलपर्यंत राबविण्याचा आमचा प्रयत्न असून एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा चार्ज असल्यामुळे त्याला काम करण्यासाठी ही सिस्टीम सोयीस्कर ठरणार आहे.
यामुळे प्रत्येक कर्मचार्यांचे ऑनलाइन रेकॉर्ड मेन्टेन करणे शक्य होणार आहे. ऑनलाइन अटेंडन्स प्रणाली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेली असून कामकाजात पारदर्शकता येणार आहे.
कामकाजात सुसूत्रता येईल आणि जे उशिरा कामावर येऊन लवकर घरी जातात अशा कर्मचार्यांना लगाम बसेल, असे देखील कर्मचार्यामध्ये चर्चा आहे.
जिल्हा परिषदेत आतापर्यंत 1 हजार कर्मचार्यापेक्षा अधिक कर्मचार्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. या नोंदीमुळे कर्तव्यात कसूर करणार्या कर्मचार्यांवर वचक बसणार आहे.
हा उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद म्हणून जळगाव जिल्हा परिषद ठरणार आहे, असे सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी सांगितले.