जळगाव | प्रतिनिधी Jalgaon
तालुक्यातील मोहाडी येथील एका किराणा दुकानावर उधारीच्या कारणावरुन सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणे एका तरुणास खूपच महागात पडले. या तरुणावर सहा जणांनी मारहाण करुन त्याच्यावर १६ रोजी सायंकाळी कुर्हाडीने वार करुन प्राणघातक हल्ला केला.
येथील गोविंदा गंगाराम गवळी (वय २८) हा तरुण कामावरुन घरी जात होता. त्याचे आतेभाऊ विजय गजानन गवळी यांचे मोहाडीतच किराणा दुकान आहे. या दुकानावर शरद दिनकर कोळी, कृष्णा गोपाल तायडे, संतोष यादव कोळी, विशाल संजय कोळी, सागर संजय कोळी, गोपाल रामा तायडे यांचा उधारीच्या कारणावरुन वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी गोविंदा गवळी याने मध्यस्थी केली. त्यानंतर तो घरी जात होता. त्यास दुकानावर वाद घालणार्यांनी रस्त्यावर अडवून शिविगाळ करीत मारहाण केली.
तसेच शरद दिनकर कोळी याने गोविंदा गवळी याच्या डोक्यावर कुर्हाडीने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारानंतर गोविंदा गवळी याने फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहेत.