<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>शहरातील मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सागरपार्कची जागा आरक्षणातून वगळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने १०० कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा आरोप रविवारी भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत केला.</p>.<p>वॉटरग्रेस व बीएचआर पतसंस्था जमिनी खरेदीप्रकरणी माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचे प्रसारमाध्यमांमध्ये नाव घेतले जात असल्याने आज भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. </p><p>दरम्यान, वॉटरग्रेस प्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</p><p>आमदार राजूमामा भोळे पुढे म्हणाले की, शहरातील सागरपार्कची जागा हडप करण्यासाठी १०० कोटी रूपयांची सुपारी देण्यात आलेली आहे. ही सुपारी महाविकास आघाडी सरकारतर्फे देण्यात आली असून ही जागा आरक्षणातून वगळण्यात यावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने ही जागा महापालिकेच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट केले असले तरीही हा प्रकार होत आहे. एक वकील आणि एक महिला हे आयुक्तांवर यासाठी दबाव आणत असल्याचा आरोपही आमदार भोळे यांनी केला. </p><p>यासोबत कोल्हे यांच्या भूखंडाच्या प्रकरणात लाठी वकिलांनी कमिशन घेतले असल्याचा आरोप राजूमामा भोळे यांनी केला. राठी वकिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली. आता सुध्दा सागर पार्कच्या जागेसाठी १०० कोटी रूपयांची मागणी करण्यात येत आहे. </p><p>वॉटरग्रेसप्रकरणी अनेक गावगप्पा सुरू असतांना हे प्रकरण त्यापेक्षा किती तरी पटीने मोठे असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले.</p>