पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :
पिंपळनेर येथील लाटीपाडा धरणात उजव्या कालव्यामध्ये 70 वर्षीय शेतकर्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिंपळनेर येथील मंगलमूर्ती नगर मध्ये राहणारे 70 वर्षीय भिकन चिंधु वानखेडे हे सकाळी 10 वाजता आपल्या शेताकडे गेले होते, परंतु दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्यात पाण्यात तरंगताना मिळून आला.
याबाबत पिंपळनेर पोलिसांना त्यांचा भाचा धनंजय दिलीप गवळी यांनी माहिती दिली. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांचे पथक दाखल झाले.
पंचनामा करून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला, ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे मृतदेह दाखल केला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.
भिकन वानखेडे हे शेतकरी असून धरणाजवळ त्यांची शेती आहे, त्यांची पत्नी सतत आजारी राहते. त्यामुळे ते मानसिक तणाव खाली होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. भिकन वानखेडे यांच्या मृत्यूचे कारण समजून आले नाही ते पाण्यात कसे पडले हे तपासाअंती समजून येईल.
याबाबत पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाँ डी.डी. वेंदे करीत आहेत.