धुळे - Dhule - प्रतिनिधी :
नेर, म्हसदी, उंभरे, चिकसे परिसरात काल वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे ..
शेतात पाणी शिरले. शेतातील कांदा खराब झाला. तसेच पपई, केळी, कापूस, डाळींब, बाजरी, ज्वारी, मका, उडीद, मुग या पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचा पंचनामा झाला नसला तरी लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कांदा चाळींचे पत्रे वार्याने उडून गेले.
दरम्यान शहरालाही काल मध्यरात्री पावसाने झोडपून काढले. कॉलनी परिसरात पाणी साचल्याने घरांमध्ये पाणीही शिरले. अनेक कॉलन्यांचा संपर्कही तुटला आहे. तर शनिनगरमध्ये घर कोसळून नुकसान झाले आहे.
कालरात्री साक्री तालुक्यातील उंभरे, देगाव परिसरात जोरदार गारपीट झाली. तर म्हसदी परिसरात वादळी वार्यासह पाऊस झाला. धुळे तालुक्यातील नेर परिसरातही वादळी वार्यासह पाऊस झाला.
यामुळे कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा शेतातील कपाशी, डाळींब, पपई पिके आडवी पडून गेले. तसेच कापूस, ज्वारी, बाजरी, मका व अन्य पिके हातात येण्यासारखी झाली होती.
परंतू पावसामुळे पिके आडवी पडली. पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. मका व बाजरी पिके तर जमीनदोस्त झाली आहेत.
नेर परिसरातील खंडलाय, बांबुर्ले, शिरधाने, भदाणे, कावठी, अकलाड, मोराणे या गावातही मुसळधार पाऊस झाला आहे.
यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेत पिकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
कॉलन्यांचा संपर्क तुटला
धुळे शहरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे साक्री रोडवरील गणेश कॉलनी, गुरुनानक सोसायटी, रामदास नगर, श्रीहरी कॉलनी, अजिंक्यतारा सोसायटी, सत्यसाईबाबा सोसायटी, लक्ष्मी नारायण नगर, शिवतारा, कल्याणी नगर आणि देवपूरातील जगन्नाथ नगर, त्र्यंबक नगर, तुळशिराम नगर, गीता नगर, भरत नगर, जयहिंद कॉलनी, इंदिरा गार्डन परिसर, आनंद नगर, मयुर कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, नेहरु नगर आदी कॉलन्यांमध्ये पाणीच पाणी साचले.
काही काही कॉलन्यांचा संपर्क तुटला. काही व्यापारी संकुलांमध्येही पाणी शिरले. पाण्याचा निचारा होत नसल्याने दिवसभर पाणी कॉलन्यांमध्ये साचले होते.
मुख्य रस्त्यांपर्यंत कॉलन्यांमधून येणे नागरिकांना पायी देखील अशक्य झाले. पाणी आणि चिखलातून रस्ता काढावा लागला.
साक्री रोडवरील वसाहतींमध्ये अधिक प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे नुकसानही झाले. काही घरांमध्ये पाणीही शिरले.
12 तास वीजपुरवठा खंडित
शहरात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. साक्री रोडवरील वसाहतींसह अन्य कॉलन्यांमध्ये रात्रभर वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. आज दुपारी 1 वाजेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.
कपाशी पिकाचे झाले नुकसान
पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीचे पिक धुळे जिल्ह्यात अधिक प्रमाणात घेतले जाते. यंदाही शेतकर्यांनी कपाशीचा पेरा जास्त प्रमाणात केला.
परंतू काल झालेल्या पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली. रब्बी हंगामात पिके हातातून गेली. आता खरीप हंगामात दोन पैसे मिळतील म्हणून शेतकर्यांनी कपाशीचा पेरा केला. पण देवाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे.