धुळे - Dhule - प्रतिनिधी :
तालुक्यातील विंचूर गावाजवळ पुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन तीन जणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तिघे तरुण काम शोधून घराकडे परतत असताना रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेवा नानला चौहान (वय 28), श्यामलाल बरकत खरते (वय 30) रा.शिवन्या ता. सेंधवा जि. बडवानी) व कानसिंग कसा रावत (वय 19) रा. भामपुरा ता. सेंधवा जि. बडवानी, मध्यप्रदेश अशी तिघा मयतांची नावे आहेत. तिघे एमएपी 46 एमबी 8972 क्रमांकाच्या दुचाकीने चाळीसगावहून धुळेमार्गे सेंधवा गावाकडे काम शोधून पुन्हा घराकडे जात होते.
धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ चाळीसगावच्या दिशेने जाणारा टीएन 18 एपी 7920 क्रमांकाच्या चौदा चाकी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचा चेंदामेंदा झाला.
अपघात होताच मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ मदतीला धाव आले. गंभीर जखमी असलेल्या तिघांना रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिघांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.याप्रकरणी बरकत जिरला खरते (53, रा शिवन्या, ता. सेंधवा जि. बडवानी) यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.