<p><strong>धुळे - Dhule - प्रतिनिधी :</strong></p><p>तब्बल 950 पेक्षा जास्त सुधारणांची परिपत्रके लागू करुन शासनाने जीएसटीची प्रक्रिया दिवसेंदिवस क्लिष्ठ केली आहे. </p>.<p>यामुळे व्यापार्यांना त्रास होत असून न कळत झालेल्या चुकांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. या संदर्भात आपला रोष व्यक्त करण्यासाठी धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला. यास व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.</p><p>जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील जवळपास 70 टक्के व्यापारी हे छोट्या स्वरुपात व्यवसाय करतात. </p><p>ते स्वत:च मालक, मुनिमजी मजुरी आणि मेहनत करणारे असतात. हे सर्व वर्गकर प्रणालीपासून दूर होते. परंतू जीएसटी लागू झाल्यापासून प्रत्येक व्यापारी याचा हिस्सा बनले आहेत. </p>.<p>विविध करांचे एकत्रिकरण जीएसटी करण्यात आले असून आतापर्यंत 950 हून अधिक सुधारणांची परिपत्रके लागू करण्यात आली आहेत. यामुळे नजरचुकीने झालेले विवरण पत्रकातील चूक दुरुस्त करता येत नाही.</p><p>ज्यांना कर दिला त्यांनी तो भरला नाही तर दंड व व्याजाचा भुर्दंड येतो. विवरण पत्रास उशिर झाल्यास जमा कराचा परतावा नोंदविता येत नाही. काही व्यापार्यांना वर्षाकाठी साधारणत: 25 विवरण पत्र दाखल करावे लागतात.</p><p>जीएसटी शासनाने लागू केली असून तो रद्द करण्याचा निर्णय व्यापारी बांधव घेवू शकत नाही. दंड व व्याजाचे दर देखील 18 ते 24 टक्के असून ते जाचक आहेत.</p>.<p>यासह अनेक अडचणी असल्याने व्यापारी वर्ग पुर्णत: त्रासला आहे. शासनाला आपण भावना कळवाव्यात, यातून मार्ग काढावा अशी अपेक्षा याद्वारे व्यक्त करण्यात आली.</p><p>शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना आग्रारोडवरील व्यापार्यांनी तसेच शहरातील इतरही भागातील व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.</p><p>यामुळे विविध संघटनांच्या एकत्रित धुळे व्यापारी महासंघाने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज शहरात पहावयास मिळाले. सनदशीर मार्गाने व्यापार्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्यात.</p>