<p><strong>धुळे - Dhule - प्रतिनिधी :</strong></p><p>शिरपूर तालुक्यातील गांजा प्रकरण उघडकीस येवून एक महिना उलटूनही जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक यांचा याकडे कानाडोळा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे.</p>.<p>शासकीय यंत्रणा नेमकी कुणाच्या दबावाखाली काम करते आहे? असा सवालही श्री. गोटे यांनी केला आहे.</p><p>श्री. गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यात शासकीय वन खात्याच्या सुमारे 500 एकर जमीनीवर गांजाची लागवड केलेली आहे. </p><p>एकूण 1500 एकर जमीनीवर गांजाची लागवड केल्याचे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर महसूल, पोलीस व वन खात्याने एकत्रीतपणे कारवाई करुन काही प्रमाणात गांजा जप्तही केला.</p>.<p>पण जप्त केलेल्या गांजापेक्षा कितीतरी पटीने अधिक गांजा गायब झाल्याची किंवा परस्पर विक्री केल्याची उदाहरणे तेवढीच आहेत.</p><p>वस्तुत:, एव्हाना नाशिक विभागाचे पोलीस महासंचालक, नाशिक विभागाचे महसूल आयुक्त, मुख्य वन संरक्षक इत्यादी अधिकार्यांनी आपल्या स्थानिक कर्मचार्यांसह या भागात येवून ठाण मांडून बसायला हवे होते.</p><p>परंतू तुरळक हालचालीं व्यतिरिक्त काहीही घडले नाही. अजून पर्यंत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच जिल्हा वन अधिकार्यांनी तर ढुंकुनही पाहिलेले नाही.</p><p>दुसर्या अर्थाने हे प्रकरण व्यवस्थीतरित्या दडपून टाकण्याचा प्रयत्नच शासकीय यंत्रणेच्या प्रमुखांनी चालवला असल्याचेही श्री. गोटे यांनी पत्रकात नमुद केले आहे.</p>