खेडगाव | वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव व बोपेगाव परिसरात गेल्या काही दिवसापासून सरस्वती नदीलगत बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव श्वानांना लक्ष्य करत धुमाकूळ घातला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कुत्र्यांना बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आहे. वनविभागाकडून पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातुन केली जात आहे.
खेडगाव येथील तानाजी मौले यांच्या गाइचे वासरू बिबट्याने फस्त केले तर दत्तात्रय कावळे यांच्या गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु कावळे यांच्या सतर्कते मुळे तो टळला.
दत्तू कावळे, दिगंबर मौले या नागरिकांना बिबट्या प्रत्यक्ष आढळून आला असून सायंकाळी पाच वाजे नंतर घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. वनविभागाने या पूर्वी परीसरात पिंजरा लावला होता परंतु त्याला यश आले नाही.
अजूनही बिबट्या जाळ्यात येत नसल्याने परिसरात अजून पिंजरे वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी खेडगाव बोपेगाव,सोनजांब परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
वन विभागाच्या पाहणी नंतर सदर भागात असल्याचे निदर्शनास आले असून परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच आपल्या जनावरांचे गोठे बंदिस्त करून घ्यावे व पाच,सहा वाजेनंतर घराबाहेर निघणे टाळावे.
ज्योती झिरवाळ, वनाधिकारी दिंडोरी
गेल्या एक महिन्यापासून खेडगाव परिसरात बिबट्याची दहशत असून सायंकाळी घराबाहेर निघणे मुशिक्ल झाले आहे.तरी वन विभागाने बिबट्याचा लवकरात बिबट्याचा बंदोबस्त करावा.
दिगंबर मौले, शेतकरी