मुंबई:
उध्दव ठाकरे सरकार सत्तेवर येवून १५ दिवस झाले नाहीत तोच मंत्रालयात आत्महत्या करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. प्रियंका गुप्ता या महिलेने मंत्रालयाच्या गँलरीतून उडीमारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीसांना मारहाण प्रकरणात तिच्या पतीला अटक केली आहे.
मध्यरात्री उशिरापर्यंत बेकायदा ज्यूस सेंटर सुरु ठेवत असल्याने पोलिसांनी कारवाई करत तिच्या पतीला अटक केली आहे. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पतीला सोडविण्याच्या मागणीसाठी ती सचिवांकडे दाद मागण्यासाठी मंत्रालयात आली होती. मात्र ज्येष्ठ अधिकारी तिला भेटले नाहीत त्यातून निराश होत तिने उडी मारूनजीव देण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मंत्रालय सुरक्षा पोलिसांनी दिली आहे.
सहाव्या मजल्यावरुन उडी मारल्याने ती जळीवर पडल्याने तिचा जीव वाचला आहे. पोलिसांनी ताब्यात घेवून तिची चौकशी केली आहे. या महिलेला मरिन ड्राइव्ह पोलीस स्थानकात नेण्यात आले तेथे रितसर जबाब नोंदवून तिला सेंट जॉर्ज रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. दुपारच्या चारच्या सुमारास मंत्रालयात आलेल्या या महिलेने मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली.
यापूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक असलेल्या 43 वर्षीय हर्षल सुरेश रावतेचा मृत्यू झाला.तर अहमदनगरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अविनाश शेटेने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती.
त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशनं मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होते. मंत्रालयात येऊन आत्महत्या किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन तत्कालीन फडणवीस सरकारने मंत्रालयाच्या पहिल्या मजल्याला जाळी बसवली आहे.