समृद्धी महामार्गाच्या कामामुळे विजेच्या तारा होत्या जमिनीलगत
सोनेवाडी (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात महानुभव आश्रम कृष्ण मंदिराजवळ समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे. या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बाजूला असलेल्या विजेच्या ताराची उंची थेट जमिनीलगत लोंबकळती झाली आहे. काम करण्याच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे आपल्या घरी जात असलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा या जमीनीलगत असलेल्या तारांना चिटकून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जेऊर कुंभारी गावावर शोककळा पसरली आहे.
काल रविवारी मंगेश पालवे हे आपल्या घरच्यांसोबत आंबे विक्रीसाठी जेऊर कुंभारी येथील पेट्रोल पंपाजवळ नगर-मनमाड हायवे लगत दुकान मांडून बसलेले होते. आंब्याची विक्री संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू होती. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी धनसी मंगेश पालवे वय 8 वर्षे व तिची मावस बहीण पतिका निलेश आव्हाड वय 15 वर्ष याही सोबत होत्या. संध्याकाळ झाल्यामुळे या मुली घराच्या ओढीने समृद्धी महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणाहून निघाल्या होत्या. समृद्धी महामार्ग ने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर भर टाकून रस्ता बनविण्याचे काम सध्या चालू आहे.
भरावच्या कामाची उंची वाढल्यामुळे या विजेच्या तारांची उंची कमी झाली. या तारा जमिनीलगत आल्या होत्या . घरी जात असताना या मुलींच्या या तारा लक्षात आल्या नाही आणि त्यातच त्यांचा घात झाला. धनसी मंगेश पालवे व पतिका निलेश आव्हाड या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बाब थोडेसी दूर असलेल्या मंगेश पालवे यांच्या बहिणीच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करत लोकांना मदतीसाठी बोलावून घेतले.
मात्र तोपर्यंत या दोनही चिमुरड्याचा अंत झाला होता. घटनेची माहिती कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश माणगावकर यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्हीही मुलींचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. रात्री उशिरापर्यंंत पंचनामा करण्याचे काम चालू होते.
समृद्धी महामार्गाचे काम सध्या कोपरगाव तालुक्यातील अनेक भागात चालू आहे. मात्र या कामांच्या ठिकाणी आणि कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले. कालच्या घटनेने संपूर्ण जेऊर कुंभारी परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चालू आहे.