Sunday, April 28, 2024
Homeनगरतळेगाव दिघे येथील ग्रामसभेतून कामगार तलाठ्यास बाहेर काढले

तळेगाव दिघे येथील ग्रामसभेतून कामगार तलाठ्यास बाहेर काढले

खरिपाच्या पंचनाम्यास आक्षेप

तळेगाव दिघे (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे मंगळवारी सकाळी आयोजित ग्रामसभा गदारोळात पार पडली. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांचे योग्य पद्धतीने पंचनामे करण्यात आले नाहीत, असा आक्षेप पदाधिकारी व शेतकर्‍यांनी घेतला. या कारणावरून कामगार तलाठ्यास धारेवर धरीत पदाधिकार्‍यांनी ग्रामसभेतून बाहेर काढले. शिवाय कामगार तलाठी श्री. नरवडे यांच्या बदलीचा ठराव करण्यात आला.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे प्रजासत्ताक दिनी न घेतलेली ग्रामसभा मंगळवारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच बाबासाहेब कांदळकर होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे, सचिन दिघे, गणपत दिघे, दादासाहेब दिघे, विठ्ठल दिघे, रामनाथ दिघे, नंदकुमार पिंगळे, सूर्यभान दिघे, यशवंत कांदळकर, संपतराव दिघे, मच्छिंद्र दिघे, संजय दिघे, बाळासाहेब दिघे, अरुण दिघे, भाऊसाहेब दिघे, अमोल दिघे, अशोक जगताप, मतीन शेख, अशोक इल्हे, ग्रामविकास अधिकारी बी. जी. नाडेकर, कृषी सहायक संदिप जोर्वेकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लता रायभान, गणेश बोखारे आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

अवकाळी पावसाने खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही कामगार तलाठी श्री. नरवडे यांनी योग्य पद्धतीने पंचनामे केले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना खरिपाच्या नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागणार आहे. याच प्रश्‍नावरून ग्रामसभेत आरडाओरडा व बाचाबाची सुरू झाली. पदाधिकारी व शेतकर्‍यांनी चांगले काम करता येत नसेल तर बदली करून घ्या, असे कामगार तलाठी श्री. नरवडे यांना सुनावत ग्रामसभेतून बाहेर काढले. कामगार तलाठी नरवडे यांच्या बदलीचा ठराव यावेळी करण्यात आला.

सध्या रब्बी हंगाम सुरू असताना नियमित वीजपुरवठा केला जात नाही, या प्रश्‍नावरून शेतकरी संतप्त व आक्रमक बनले होते. गावठाण हद्दवाढ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना ग्रामसभेत करण्यात आली. यावेळी प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर. तुकाराम दिघे, रमेश दिघे, रामनाथ दिघे यांनी ग्रामसभेत विविध विषय मांडले. ग्रामविकासासह विविध विषय ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या