टॉमेटो पिकाबद्दल अफवा पसरवणे थांबवा ; किसान सभेचे आवाहन

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर – टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत असे आवाहन किसान सभा करत आहे.

किसान सभेचे डॉ.अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ.अजित नवले यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार, वनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे. संबंधितांनी ही बाब लक्षात घेऊन या बाबतच्या अफवा पसरवणे तातडीने थांबवावे.

अफवा पसरवण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर असलेले व्हिडीओ एडिट करून वापरले जात आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत असे आवाहन किसान सभा करत आहे.

टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभागाने काम सुरू केले आहे. बाधित झाडांचे नमुने बेंगलोर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसात याबाबत निदान होईल अशी अपेक्षा आहे. कृषी विभागाने या निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून आजारावरील उपचाराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन तातडीने उपलब्ध करून दयावे असे आवाहन किसान सभा करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *