कोरोना : आता मिनी आयपीएल विश्वचषकाचा फॉरमॅट वापरणार ?

कोरोना : आता मिनी आयपीएल विश्वचषकाचा फॉरमॅट वापरणार ?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील आठही संघ यांच्यात १४ मार्च २०२० रोजी महत्वपूर्ण बैठक पार पडली. गव्हर्निंग कौन्सिलने बोलावलेल्या या बैठकीत आयपीएल १३ या नव्या हंगामासंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर आयपीएलचा हंगाम १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. बीसीसीआयने स्पर्धेला १५ एप्रिलपासून सुरुवात केली तर स्पर्धा ४० दिवस पार पडेल. कारण अन्य आंतरराष्ट्रीय संघाचा आयसीसीच्या दौऱ्यांचा कार्यक्रम पाहता स्पर्धा जास्तकाळ लांबवणे योग्य होणार नाही.

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. यात लोकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. सरकारच्या सूचनेनुसार आम्ही सर्व स्थानिक स्पर्धा रद्द केल्या आहेत. आम्ही आठही संघांच्या मालकांशी सविस्तर चर्चा केली आहे. सध्याची परिस्थिती आणि पुढे काय होऊ शकते यावर बैठकीत झालेल्या चर्चेत संवाद साधण्यात आला आहे. आयपीएल आयोजन करण्यास आमची काहीच हरकत नाही. असे बीसीसीआय अध्य्क्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.

आयपीएलचा नवा हंगाम २९ मार्चपासून सुरु करण्याऐवजी १५ एप्रिलपासून सामने सुरु करण्याचा निर्णय होण्यापूर्वी सामने बंद दरवाजात खेळवता येतील का ? याचा विचार केला तर, आता मिनी आयपीएल खेळवले तर डबल हेडर सामने खेळवले जाऊ शकतील. पण स्टार स्पोर्ट्स याच्या संपूर्ण विरोधात असल्याचे बोलले जात आहे. सामन्यांची संख्या कमी करून २०१९ विश्वचषकाच्या राऊंड रॉबिन फॉरमॅट नुसार आयपीएल खेळवण्याचा विचार झाल्यास आठ संघाची विभागणी दोन गटांमध्ये केली जाऊ शकते. आणि दोन्ही गटातील टॉप २ संघ बाद फेरीसाठी आपला प्रवेश निश्चित करतील. आणि नंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

कोरोना व्हायरसचा धोका वाढल्याने स्पर्धा पुढे ढकलण्याचा दबाव वाढला होता. केंद्राने यंदाची स्पर्धा घेऊ नका असा सल्ला दिला होता. स्पर्धा आयोजित करायची झाल्यास रिकाम्या मैदानात प्रेक्षकांशिवाय करा. असे सरकारने स्पष्ट केले होते. सार्वजनिक आरोग्य आणि शेअरहोल्डर्स यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात बीसीसीआय भारत सरकार , क्रीडा मंत्रालय , आरोग्य आणि कुटूंब कल्याण यांच्या संपर्कात असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. बीसीसीआयने सुरुवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे २९ मार्चला आयपीएल सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार होता.

स्पर्धा का होऊ शकते ?
बीसीसीआयने स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल असे सांगितले होते. पण कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धा छोट्या स्वरूपात घेतल्याने सर्व सामने रिकाम्या मैदानात घेता येऊ शकतील.

रद्द होण्याची शक्यता किती ?
सध्यातरी आयपीएल रद्द होण्याची शक्यता नाही. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या सल्ल्यावर बीसीसीआय विचार करत आहे. दुसऱ्या पर्यायावर विचार करत आहे. कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अधिक बिघडली तर यंदाचा हंगाम रद्द केला जाऊ शकतो. स्पर्धा सुरु होण्यासाठी आठ दिवस बाकी आहेत. आणि आता प्रत्येक दिवस महत्वाचा आहे.

स्पर्धेचे स्वरूप
बीसीसीआय समोर स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा पर्याय आहे. अशा परिस्थितीत सामन्याचे ठिकाण बदलले जाऊ शकते. २०-२५ साखळी सामन्यांनंतर अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. आणि स्पर्धा १ महिन्याच्या आत पूर्ण केली जाऊ शकते.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com