Thursday, April 25, 2024
Homeनगरछिंदमचे काय झाले ? नगरमध्ये जोरदार चर्चा

छिंदमचे काय झाले ? नगरमध्ये जोरदार चर्चा

अहमदनगर – माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द झाल्याची जोरदार चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य त्याला भोवले आहे. यापूर्वीच्या महापालिका टर्ममध्ये छिंदम भाजपकडून निवडून आला होता. त्यावेळी भाजपमध्ये दोन गट पडले. एका गटाकडून त्याने उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यास भाजपच्या एका गटासह राष्ट्रवादी, काँग्रेस यांचा पाठींबा होता. मात्र निवडणुकीच्या वेळी भाजप- शिवसेनेत तडजोड झाल्याने छिंदम याची उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाली.

या पदावर असताना स्वच्छतेसाठी एक कर्मचाऱ्याला फोनवर बोलताना छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढले. या प्रकरणावरून राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव महापालिकेने एकमताने घेतला होता. त्यावर मंत्रालयात सुनावणी सुरू होती. काल गुरुवारी 27 फेब्रुवारी ला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. काल रात्रीपासूनच त्याचे नगरसेवकपद रद्द झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात मात्र महापालिकेला आज दुपारपर्यंत काहीही कळविण्यात आले नव्हते. मंत्रालयात पद रद्द झाल्याचा आदेश तयार झाल्याचे सांगितले जाते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या