Thursday, May 9, 2024
Homeनगरश्रीगोंदा: अजनूजमध्ये दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपी अद्याप फरार

श्रीगोंदा: अजनूजमध्ये दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपी अद्याप फरार

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – आपल्या शेतातील माती उचलून दुसर्‍याच्या शेतात टाकत असल्याचे लक्षात आल्यामुळे आमच्या शेतातील माती का उचलता असे विचारल्याचा राग येऊन बाप लेकांना लोखंडी खोर्‍याने मारहाण करून डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या जीवघेण्या हल्ल्यात दोघे बाप लेक गंभीर जखमी झाले आहेत; तर एका जणाला लाथाबुक्कयांनी मारहाण केली असून तो किरकोळ जखमी झाला आहे. हे कुटुंब प्रचंड दहशतीखाली असून आरोपी अटक नसल्याने अजूनही कुटुंबावर दबाव आणत असल्याचे फिर्यादीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अजनूज मधील या घटनेबाबत अजनूज येथील संजय दत्तात्रय क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संतोष रामदास क्षीरसागर,अर्जुन रामदास क्षीरसागर, गणेश पोपट क्षीरसागर तिघे रा. अजनूज यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या 13 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता फिर्यादी संजय त्यांचे वडील दत्तात्रय व भाऊ राजेंद्र हे तिघेही त्यांच्या अजनूज शिवारातील गट नं. 437 मधील शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना तेथे त्यांच्या शेतातील माती गणेश पोपट क्षीरसागर हे घमेले व खोर्‍याच्या साहाय्याने भरून बाजूच्या शेतात टाकत असल्याचे दिसले. त्यामुळे फिर्यादीचे वडील दत्तात्रय यांनी गणेश यांना ही आमची वडोलोपार्जित जमीन आहे तू आमच्या शेतातील माती उचलून घेऊन जाऊ नकोस असे समजावून सांगत स्वतःच्या शेतातील माती उचलण्यास मज्जाव केला. त्याचा गणेश यांना राग आला त्यांनी या तिघा बापलेकांना शिवीगाळ केली. व फोन करून संतोष रामदास क्षीरसागर व अर्जुन रामदास क्षीरसागर या दोघांना शेतात बोलावले.

हे दोघे शेतात आल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यातील संतोष याने फिर्यादीचे वडील दत्तात्रय यांच्या डोक्यात लोखंडी खोर्‍याने मारले तर अर्जुन यांनी फिर्यादीचे भाऊ राजेंद्र यांच्या डोक्यात कोयत्याने मारले या जीवघेण्या हल्ल्यात हे दोघे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच फिर्यादी संजय यांना देखील या लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच या मारहाण करणार्‍यांनी आमच्या विरोधात पोलीसात तक्रार दिली तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मारून टाकू अशी धमकी दिली शेतातील माती उचलण्यास मज्जाव करण्याच्या किरकोळ कारणातून भावकीतल्याच लोकांकडून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत आहेत.

आरोपींना राजकीय वरदहस्त – क्षीरसागर
याबाबात अद्याप आरोपी अटक करण्यात आले नसल्याने या आरोपीची दहशत परिसरात आहे. यांच्या दहशतीमुळे शेजारील अनेक शेतकरी आपले शेत विकून गेले आहेत. यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळावे तसेच आरोपीनी तातडीने अटक करावी अशी मागणी संजय क्षीरसागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या