आश्वीत जनता कर्फ्यू कडकडीत
आश्वी (वार्ताहर)- कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या जनता कर्फ्यू या संकल्पनेला संगमनेर तालुक्यातील आश्वीसह 28 गावांमधील नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांनी रविवारी शंभर टक्के बंद पाळून पाठिंबा दिला आहे.
यावेळी उंबरी-बाळापूर, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, प्रतापपूर, पानोडी, निमगावजाळी, ओझर, रहिमपूर, कनोली, मनोली, दाढ, चणेगाव, शेडगाव, हंगेवाडी, मालुंजे, वरंवडी, झरेकाठी, मांची, कोंची, पिपंरणे, अंभोरे, डिग्रस, खळी, खरशिंदे, शिबलापूर, कनकापूर, जोर्वे, सादतपूर, औरंगपूर, चिंचपूर आदी गावांतील नागरिक, व्यापारी व व्यावसायिक यांनी रविवारी 100 टक्के बंद पाळला. याप्रसंगी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगाळे, हवालदार विनोद गंभिरे, संजय लाटे, भागाजी धिंदळे, आर. टी. मोरे, आर. बी. भाग्यवान, हुसेन शेख, रवींद्र ब्राम्हणे, शांताराम झोडगे, प्रसाद सोनवणे, अमर घाडगे, आनंद वाघ, व्ही. व्ही. दांडगे, संजय गायकवाड, अनिल शेळके, योगेश रातडीया, रवींद्र बालोटे यांनी नागरिकांना घाबरू नका, सतर्क राहा, गर्दी टाळा, घरातच राहा तसेच प्रशासन व वैद्यकीय दिशानिर्देशांचे पालन करा असे आवाहन केले.
नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाचे पालन करत कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यांची आपुलकीने विचारपूस करत चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था केली होती. तर कारण नसताना रस्त्यावर फिरणार्या दोन तीन तरुणांना पोलिसांनी चोपही दिला आहे. परिसरातील अत्यावश्यक सेवाही काही काळ बंद ठेवण्यात आली होती. तर गर्दीची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेली बस स्थानके, राजहंस पॉइर्ंट, बाजरतळ, पेट्रोल पंप आदी ठिकाणे पूर्णतः बंद होती. तसेच शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी दूध संकलन केद्रेंही पहाटे सुरू करण्यात आली होती, तर सायंकाळचे संकलन हे रात्री उशीरा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तळेगाव दिघे येथे जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव दिघे (वार्ताहर)- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे सहित परिसरात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून तळेगाव दिघे चौफुलीसह रस्त्यांवर सन्नाटा दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आठवडे बाजार बंद, दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार रविवारी नागरिकांनी जनता कर्फ्यूचे पालन केले. जनता कर्फ्यूमुळे तळेगाव दिघे चौफुली परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. दक्षता म्हणून नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व अधिकवेळ घरातच थांबावे, असे आवाहन तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केले आहे.