मार्चमधील अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 33 हजार हेक्टर क्षेत्राला फटका

jalgaon-digital
1 Min Read

पाथर्डी, राहुरी व नेवासा तालुक्यांना सर्वाधिक दणका

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुळे सर्वजण हैराण झालेले असतानाच, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा 33 हजार 425 हेक्टर क्षेत्राला फटका बसला. त्यातील 21 हजार 369 हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. 457 गावांतील अनेक शेतकर्‍यांच्या शेतात हे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

मार्च महिन्यातील 6 ते 7 दिवस जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. यात भाजीपाला, फळांसह काढणीला आलेल्या गहु, कांद्याचे नुकसान झाले. या पावसाचा साधारण आठ तालुक्यांतील शेतीला फटका बसला.

श्रीगोंदा तालुक्यात 185, श्रीरामपूर तालुक्यात 10 हजार 852, पारनेर तालुक्यात 1, कोपरगाव तालुक्यात एक हजार सतरा अशा 12 हजार 56 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्यात गहू, कांदा, हरभरा, द्राक्षांना फटका बसला आहे. सहा तालुक्यांतील 21 हजार 369 हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

361 गावांतील 30 हजार 591 शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक फटका, कांदा, गहू, मका, भाजीपाला पीकांना बसला आहे. तर पाथर्डी, राहुरी आणि नेवासा या तालुक्यांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *