Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘मनरेगा’च्या माध्यमातून ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

‘मनरेगा’च्या माध्यमातून ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

नाशिक : करोना संकटात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नाशिक विभागात ७५ हजार ९९७ मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

मनरेगा अंतर्गत शेल्फवर ९८ हजार ८५१ कामे ठेवण्यात आली असून १ लाखापेखा अधीक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. विभागातील एकूण ५०७७ पैकी २६०३ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत.

- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्यात १०३१०, धुळे ११०८०, जळगाव ५४४१, नाशिक २०३४४ आणि नंदुरबार जिल्ह्यात २८८०० मजूर कामावर आहेतसोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्याचे निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्त राजारामा माने उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात जलसंधारण व गाळ काढण्याची अधिकाधीक कामे हाती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

मजूरांना एका दिवसासाठी २३८ रुपये मजूरी देण्यात येत आहे. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत १०० टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सीसीटी, वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकूल,मजगी, सलग समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटीका, फळबाग लागवड, वनीकरण अशी विविध कामे या योजनेअंतर्गत घेतली जात असल्याने गावालादेखील याचा फायदा होत आहे. विशेषत: अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढून गावाला याचा उपयोग होणार आहे.

वैयक्तिक स्वरुपाची ११९७४ कामे सुरू असून ४९ हजारावर मजूर कामावर आहेत. तर सार्वजनिक स्वरुपाची ११७७ कामे सुरू असून तेथे सुमारे २७ हजार मजूर कामावर आहेत. कोविड संकटाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले असताना ग्रामीण भागासाठी ही योजना उपयुक्त ठरत असून योजनेचा अधिकाधीक नागरीकांना लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.चिखले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या