‘शिवशाहीला लागणार ब्रेक! जाणून घ्या कारण

‘शिवशाहीला लागणार ब्रेक! जाणून घ्या कारण

नाशिक । भारत पगारे

राज्यमार्ग परिवहन महामंडळात (एसटी) शिवशाही बसेस आणि अन्य बसेसची स्वच्छता करणार्‍या ‘ब्रिक्स’कंपनीच्या ठेक्याला नवीन वर्षात ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे. शिवशाही बस आणि ब्रिक्स कंपनी आल्यानंतर महामंडळाला तोटा होत असल्याचे बोलले जात असून याशिवाय अ‍ॅल्युमिनियम बॉडीच्या बसेसला लोखंडी बॉडीमध्ये परावर्तित करण्याचेही कारण सांगितले जात आहे.

सन 2017 मध्ये बसेसच्या स्वच्छतेसाठीसाठी मुख्यालय स्तरावर 446 कोटी रुपयांचे वॉशिंग आणि सफाईचा ठेका तीन वर्षांसाठी ब्रिक्स कंपनीला देण्यात आला. सन 2017 मध्ये शिवशाही बसेस सुरू झाल्या. नाशिक विभागात 15 ते 20 शिवशाही बसेस करारावर धावत आहेत. याकरिता एसटी महामंडळ 19 रुपये प्रति किमी हिशोबाने भाडे अदा करते. हा हिशेब महामंडळासाठी तोट्याचा सौदा ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 20 कोटीऐवजी कर्मचार्‍यांच्या पोशाखाच्या 73 कोटींच्या कंत्राटातूनही महामंडळाला फायदा झाला नाही. महाग पोशाख अनेक कर्मचार्‍यांपर्यंत वेळेवर पोहोचले नाहीत आणि फिटिंगबाबतही अनेक तक्रारी आहेत. याशिवाय बसेसला जास्त सुरक्षित बनविण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम बॉडीला स्टील बॉडीमध्ये परावर्तित करण्याचा भार महामंडळाच्या खजिन्यावर पडला आहे. गेल्या दोन वर्षांत करण्यात आलेल्या कवायतींमुळे एसटीला फायदा कमी आणि नुकसान जास्त झाले आहे.

तर दुसरीकडे अधिकारी स्तरावर सुट्यांचा क्रम सुरूच आहे. कार्यालयांमध्ये कंत्राटावरील कर्मचारी मोठ्या संख्येने दिसत आहे, त्यानंतरही एसटीला मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत नाही. अनेक कनिष्ठ कर्मचार्‍यांकडे उपाययोजना आहेत, पण ते वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगण्यास धजावत नाहीत. त्यामुळे महामंडळाला हवा तसा फायदा होताना दिसत नसून अशावेळी कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्‍यांच्या सूचना वरिष्ठांनी ऐकून त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे बोलले जात आहे.

महामंडळ तोट्यातच
महामंडळाने तोट्यातून सावरण्यासाठी अनेक प्रयत्न केले तरी, त्यांचा फायदा झालेला नाही. एकंदरित सर्वच विभागांत महामंडळ तोट्यात असून वरीष्ठ आधिकार्‍यांनी तिजोरी रिकामी असतांना खासगी ठेक्यांच्या रूपाने कोटीच्या कोटी रुपयांची उड्डाणेे घेऊन महामंडळ हातघाईवर आणले आहे.

नवनवीन परिपत्रके
महामंडळाकडून आता कर्मचार्‍यांविरुद्ध सूडाचे राजकारण खेळले जात असल्याचे बोलले जाते आहे. कर्मचार्‍यांना, वाहकांना या पुढे सुट्या नामंजूर केल्या जाण्याची चर्चा होत असून बळजबरीने तीन दिवसाचीच सुटी घेण्यास भाग पाडले जाणार आहे, अशीही चर्चा रंगत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com