त्र्यंबकेश्वर । मोहन देवरे : तालुक्यातील हरसूल पट्ट्यातील गोडाऊनपाडा येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून हरसूल व परिसरातील आता गरजूंना अवघ्या ५ रुपयांमध्ये जेवण मिळणार आहे.
दरम्यान हरसुल येथील या शिवभोजन थाळी केंद्राअंतर्गत दररोज गरजूंना सकाळी ११ ते १ या दरम्यान थाळीचा लाभ घेता येणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे देखील नगरीत लॉक डाऊन काळात बेघरांची उपासमार होऊ नये या हेतूने शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन असल्यामुळे स्थलांतरित मजूर, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरचे बेघर, त्याचबरोबर मजुरी करून जगणारे यांचे जेवणाचे हाल होत असल्याने, त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी तातडीने शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
तहसीलदार दिपक गिरासे यांनी पाठपुरावा केल्याने तालुक्यात ही सुविधाकार्यरत होण्यास मदत झाली. तसेच जादा शिवभोजन केंद्रे सर्वत्र द्यावी अशीही सूचना त्यांनी केली आहे. यावेळी पंचायत समिती त्र्यंबकेश्वरचे सभापती मोतीराम दिवे, कार्यकर्ते विनायक माळेकर, हरसूल सरपंच सविता गावित आदी उपस्थित होते. तसेच त्र्यंबकेश्वर येथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्नील शेलार, मोहन भांगरे इ उपस्थित होते.