सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याअंतर्गत तालुक्यात तीन ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. आगासखिंड येथील शताब्दी इंजिनिअरींग महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडिया (इंडिया बुल्स) चे वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात हे सेंटर सुरु करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर १५० क्वारंटाईन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी दिली.
तालुक्यात पाथरे येथे करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला असून संबंधित रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला असेल अशा सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असतील अशा व्यक्तींना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आगासखिंड, मुसळगाव व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहेत. या प्रत्येक ठिकाणी सुमारे 150 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाच्यावतीने या ठिकाणी विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी वसतिगृहाच्या इमारती असून बर्याच सुविधा उपलब्ध आहेत.
तसेच कमी मनुष्यबळात जास्त लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था होणार आहे. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड या विलगीकरण कक्षाच्या नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून ग्रामसेवक, आरोग्य विभाग, पंचायत समितीतील इतर यंत्रणा त्यांना सहाय्य करणार आहेत.