जिल्ह्यातील १६८ जणांची यादी पोलिसांना प्राप्त; अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

जिल्ह्यातील १६८ जणांची यादी पोलिसांना प्राप्त; अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

नाशिक । दिल्ली वारी करणाऱ्या १६८ जणांची यादी जिल्हा पोलिसांना प्राप्त झाली आहे. मात्र यातील बहुतांश नागीकांचा प्रत्यक्ष तबलिगी मरकज कार्यक्रमाशी काहिच संबंध नसल्याचे तपासातून पुढे येत आहे. परंतु मरकजच्या नावे त्यांना लक्ष केले जात असल्याने समाजात विनाकारण तेढ निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन तब्लिगी मर्कज या कार्यक्रमात सहभागी काही नागरिकांना करोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाल्याने जगभरात दहशत निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने या कालावधीत दिल्लीत आलेल्या सर्व नागरिकांच्या याद्या तयार करण्याचा धडाका लावला आहे. या याद्या राज्य शासनामार्फत त्या त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक, आयुक्तांना पाठवून अशा नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये नाशिकमधील आत्तापर्यंत १६८ जणांची यादी जिल्हा पोलीस प्रशासन तसेच पोलिस आयुक्तांना प्राप्त झाली आहे. यामध्ये ९३ जिल्हा ग्रामीण भागातील आहेत तर ७५ नाशिक शहरातील आहेत, त्यांचा सोध पोलीस घेत आहेत.

शोध घेण्यात आलेल्या नागरिकांपैकी केवळ सात ते आठ लोकांचा मरकज कार्यक्रमांशी संबंध आहे. उर्वरितांचा या कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही. यातील बहुतांश नागरिक हिंदू धर्मिय असून ते शिक्षण, व्यवसाय, व्यापार तसेच पर्यटनासाठी दिल्लीला गेल्याचे समोर आले आहे. अशा नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर आजुबाजूचे नागरिक त्यांच्याकडे शंकास्पद नजरेने पाहत आहेत. काहीच कारण नसताना त्यांना लक्ष केले जात आहे. यामुळे समाजात तेढ वाढत असल्याचे चित्र आहे.

अफवा पसरवू नका
काही याद्या पोलीस प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. परंतु दिल्ली येथे गेलेल्या सर्वांचा मरकज कार्यक्रमाशी सबंध नसल्याचे समोर येत आहे. या कालावधीत धार्मिक तसेच इतर कसल्याही प्रकारचे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश, अफवा पसरवू नयेत. अन्यथा अशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– डाँ. आरती सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com