लासलगाव : केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार ग्राहकांच्या हितासाठी ‘नाफेड’ व ‘महाएफपीसी’चा ‘महाओनिअन’हा संयुक्त उपक्रमाअंतर्गत ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे.
आज लासलगाव बाजार समितीतुन नाफेडने ९३१ रुपये उच्चांकी तर ७५१ रुपये कमीतकमी बाजार भावाने ६ वाहनातील १०० क्विंटल कांदा खरेदी केला मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला बाजार भाव मिळाल्याने कांदा उत्पादकांना नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याचा कुठलाही बाजार भावात फायदा झाला नाही फक्त १९ रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली.
भारतासह जगभरातील देशांमध्ये कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असल्याने याचा थेट फटका कांदा उत्पादकांना ही बसत आहे कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहकांच्या हितासाठी नाफेड मार्फत लासलगाव बाजार समितीतून कांदा खरेदीला सुरुवात झाली मोठ्या अपेक्षेने नाफेड कांदा खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत १२५० वाहनातून २० हजार क्विंटल कांदा विक्रीला आला होता सकाळच्या पहिल्या सत्रात ७१९ वाहनातील कांद्याचे लिलाव झाले.
त्यातील ६ वाहनातील १०० क्विंटल कांदा नाफेडने घेतला त्या कांद्याला जास्तीतजास्त ९३१ रुपये , सरासरी ८०० रुपये तर कमीतकमी ७५१ रुपये बाजार भाव मिळाला तर व्यापाऱ्यांनी ७१३ वाहनातील १२ हजार क्विंटल कांदा खरेदी केला त्या कांद्याला जास्तीजास्त ८७१ रुपये , सरासरी ७५० रुपये तर कमीतकमी ४०० रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला मागील आठवड्यात ३० एप्रिलला जास्तीजास्त ९२१ रुपये , सरासरी ७७० रुपये तर कमीतकमी ४०० रुपये बाजार भाव मिळाला होता.
त्यानुसार आज नाफेडच्या कांदा खरेदीमुळे बाजार भाव स्थिर राहण्यासाठी मदत झाली.