सातपूर : राज्य शासनाने उद्योगांच्या चाकांना गती देण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरु केल्या असून गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या दुचाकी वा चारचाकी वाहनांना परवानगी दिली जात असल्याने उद्योग क्षेत्राला गती मिळेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आतापर्यंत तीन हजार कारखाने सुरू झाले असून दोन हजार लोकांना दुचाकीचे पास दिलेले आहेत. मोठ्या उद्योगांचा सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांनी शासनाने निर्धारित केलेल्या बस सेवेची अट जाचक असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ती अट काढावी अशी मागणी ही सातत्याने केली जात होती.
या बसच्या अटीमुळे अनेक उद्योग सुरू होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. कामगारांची निवड करणे व त्यासाठी बसची सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे कठीण कार्य होते.
मात्र प्रशासनाने उद्योजकांची ही अडचण लक्षात घेत तातडीने कार्यवाही केली. व बस सोबतच दुचाकी व चारचाकी वाहनांना ही परवानगी देण्यास सुरुवात केली.
आजपर्यंत ६२६ बसेसनी एमआयडीसीकडून पासेस नेलेले आहेत. तर विविध कारखान्यातील दोन हजार कामगारांनी दुचाकी व चारचाकी साठी पासेस नेल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्रातून सुमारे साडेपाच हजार उद्योगांनी ऑनलाइन अर्ज दाखल करत उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळवलेली आहे. प्रत्यक्षात औद्योगिक क्षेत्रातून अडीच हजार ते तीन हजार उद्योग सुरू झाले आहेत.
बस ऐवजी दुचाकी व चारचाकी वाहनांना परवानगी मिळत असल्याने आणखी उद्योग सुरू करण्यास पूढे येतील. व उद्योग क्षेत्र सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी व्यक्त केला.