आता कसे बनणार अधिकारी? स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी गावी परतले; तर काही शहरात आहेत. अनेकांनी पुढे येऊन त्यांच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, त्यांना त्यांच्या भविष्याचा प्रश्‍न स्वस्थ बसू देत नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. परिणामी या भावी अधिकाऱ्यांचे अभ्यासाचे नियोजन कोलमडले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, अभ्यासिका बंद आहेत. या परीक्षेच्या तयारीसाठी उत्तर महाराष्ट्रातून मुले-मुली नाशिक शहरात येतात. येथे वसतिगृह, रूममध्ये राहतात. प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करोना वेगळेच संकट बनून आला आहे.

लॉकडाऊनचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. दरम्यान, एमपीएससीकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. अभ्यासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवस महत्त्वाचा असताना अभ्यासाचे सगळे मार्ग लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. त्याचा फटका स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला.

कोरोनाचा परीक्षांच्या तयारीवर मोठा परिणाम होणार असल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. नेहमीप्रमाणे अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करणारी मुले रूममेट असल्याने अभ्यास होत नसल्याची खंत व्यक्त करत आहेत. खासगी शिकवणी वर्ग बंद असल्याने अभ्यासात खंड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

निकालावर परिणाम
काही जण गावी परतले आहेत. मात्र, आम्ही रूममधील काही जण थांबलो. अभ्यासिकेची सवय असल्याने रूममध्ये अभ्यास होत नाही. पुस्तकेदेखील उपलब्ध होऊ शकत नाही. ऐन परीक्षेच्या काळात नियोजन कोलमडल्याने त्याचा परिणाम निकालावर होणार आहे.
– कुलदीप सराेदे, विद्यार्थी.

Share This Article