मुंबई : हिंगणघाट जळीतकांड खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली.पीडितेला न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील आणि प्रकरणाचा तपास व खटला जलदगतीने चालेल यावर कटाक्ष असेल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले
दरम्यान हिंगणघाटमधल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ६.५५ च्या सुमारास मृत्यू झाला. आठवडाभर मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अखेर संपली. त्यामुळे आज सकाळपासूनच राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आरोपीला दयामाया दाखवणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तर पीडितेच्या भावाला राज्य शासनामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारच्या वतीनं पीडितेची बाजू मांडणार आहेत. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.