कचरावेचक महिलांचा स्वच्छतेत ‘खारीचा वाटा’; ५० टक्के कचऱ्याचे रिसायकल

कचरावेचक महिलांचा स्वच्छतेत ‘खारीचा वाटा’; ५० टक्के कचऱ्याचे रिसायकल

नाशिक । गोकुळ पवार : शहरात, नगरात, गल्लीत, डम्पिंग ग्राऊंडवर पाठीला भली मोठी थैली अन हातात एक काडी असणारा कचरावेचक आजही दिसतो. शहर स्वच्छतेत महत्वाची भूमिका बजावत आपल्याला स्वच्छतेचा आनंद देणाऱ्या कचरावेचकांचे नव्हे स्वच्छतादूतांचे शहर स्वच्छतेत मोलाचे योगदान आहे.

सध्या देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविला जात आहे. याअंर्तगत स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० देखील देशभर तसेच शहरात देखील राबविले जात आहे. यामुळे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी अनेक उपक्रमही महानगरपालिकेने हाती घेतले आहेत. परंतु यामध्ये स्वच्छतादूतांच काम करणाऱ्या कचरावेचकांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कचरावेचकांच्या कचरा उचलण्याच्या कामामुळे शहराची ५० टक्के स्वच्छता होत असल्याने ती महापालिकेला मदतच होत आहे. गोळा केलेला कचरा अंगा-खांद्यावर वाहून व त्यांचे वर्गीकरण करून भंगारमध्ये विकून त्यावर हे कर्मचारी उपजिविका करतात. त्यामुळे शहरातील कचरावेचक आजही विविध योजनांपासून उपेक्षित आहे.

शहरात घंडागाड्या प्रत्येक विभागात असल्याने ठिकठिकाणांचा कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर जातो. काहीवेळा नागरिक घंटागाडीत कचरा न देता इतरत्र टाकण्यावर भर देतात. अशावेळी कचरावेचक हाच कचरा बऱ्याचदा उचलतांना दिसतात. यामध्ये नागरिक कचऱ्याचे विलीगीकरण न करता तसाच टाकता असल्याने कचरावेचकांना हातापायांना जखमा होत असतात. असाच प्रकार डम्पिंग ग्राऊंडवरही पाहायला मिळतो. त्यामुळे नागरिकांनी देखील अशावेळी कचरावेचकांना होणाऱ्या वेदना लक्षात घेऊन कचऱ्याचे विलगीकरण करून घंटागाडीत देणे आवश्यक असते.

उकिरड्यावर, रस्त्यांवर, गटारात, डम्पिंग ग्राउंडवर जमा झालेल्या कच-यातून भंगारात विकले जाणारे कागद, बाटल्या, लाकूड, लोखंड इत्यादी सामान बाजूला करणारे कचरावेचक शहरातील कचरा व्यवस्थापनाचा भाग आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनीही ओला-सुका व सॅनिटरी कचरा वेगळा करून ठेवला पाहिजे. कारण शहर स्वच्छतेची खरी धुरा या कचरावेचकांवरच अवलंबून आहे.

५० टक्के कचरा रिसायकल
कचरावेचकांमुळे साधारण ५० टक्के शहर स्वच्छ होते. हा कचरा रिसायकल होत असल्याने शासनाचा खर्च वाचण्यास मदत होते. यामध्ये प्लॅस्टिक, कागद, पेपर, गोणी, शॅम्पूच्या बॉटल्स याचा समावेश होतो. यापासून भांडे, घरावर वापरला जाणारा प्लास्टिक पत्रा, फरशी, पेपरबॅग, पॅकिंग वस्तू तयार होतात.

कचरावेचक दिवसांतील १५ ते १६ तास कचरा गोळा करण्यासाठी देतात. परंतु साधे ५० रुपयेही मिळायला मुश्किल होतात. त्यामुळे मानधनावर का होईना पण कचरावेचकांना पोटापुरते मिळण्याची सुविधा नगरपालिकेने करायला हवी. तसेच कचरा गोळा करताना अनेकदा काचा, खिळे अशा वस्तुंनी हातांना जखमा होतात. यासाठी महानगरपालिकेने आम्हाला हॅन्ड ग्लोज व इतर सुरक्षेची साधने पुरवणे आवश्यक आहे.
-अलका गणकावर, आम्रपालीनगर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com