Friday, April 26, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांचा भाजीपाला गोदावरी एक्सप्रेसने मुंबईला जाणार : खा.डॉ.भारती पवार

शेतकऱ्यांचा भाजीपाला गोदावरी एक्सप्रेसने मुंबईला जाणार : खा.डॉ.भारती पवार

नाशिक : गेली दोन वर्षापासून लासलगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणारा भाजीपाला सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. परंतु उद्यापासून गुरुवार (दि. १९) डिसेंबर पासून ही भाजीपाला पार्सल सुविधा पूर्ववत होणार असल्याची माहिती खा.डॉ.भारती पवार यांनी दिली.

लासलगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठवला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून काही तांत्रिक कारणास्तव ही भाजीपाला पार्सल सुविधा सर्वच गाड्यांची बंद करण्यात आली होती. या संदर्भात परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी येथील पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यांनी तातडीने दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

- Advertisement -

खासदार डॉ. भारती पवार यांनी भुसावळ येथील रेल्वेचे महाप्रबंधक एम.के. गुप्ता व वाणिज्य विभागाचे प्रमुख विनोद कुमार यांच्याशी संपर्क साधून ही पार्सल सुविधा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना केली होती व लासलगाव येथून शिष्टमंडळ बुधवारी भुसावळ येथे पाठवण्यात आले होते.

या शिष्टमंडळाने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व खासदार डॉ.भारती पवार यांच्याशी चर्चा करून या अधिकाऱ्यांनी तातडीने पार्सल सुविधा सुरू करणार असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली.

गुरुवार, १९ डिसेंबर पासून भाजीपाला मुंबईकडे लासलगाव रेल्वे स्थानकांवरून विविध रेल्वेगाड्यांनी रवाना होणार असल्याने या सुविधेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाळच्या सत्रात असलेल्या रेल्वे गाड्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात व सायंकाळच्या वेळी खवा देखील मुंबईकडे रवाना होण्यास आता सुरुवात होणार आहे.

शेतकऱ्यांना होणार फायदा – डॉ.भारती पवार, खासदार, दिंडोरी

गेल्या दोन वर्षापासून लासलगाव रेल्वे स्थानकावरून भाजीपाला पार्सल सुविधा बंद असल्याची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यात लक्ष घालण्याचे सांगितले होते. बुधवारी याच कारणासाठी शिष्टमंडळ देखील पाठविण्यात आले होते. त्यांना सकारात्मक प्रतिसाद अधिकाऱ्यांनी दिला असून ही सुविधा सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या