१० एप्रिलपासून शहरात व जिल्ह्यात मोफत तांदूळ वाटप : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

१० एप्रिलपासून शहरात व जिल्ह्यात मोफत तांदूळ वाटप : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

नाशिक : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत रेशनवर एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.

या योजनेतील १८ हजार मेट्रिक टन तांदूळ नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. याचे वाटप शुक्रवार दि . १० एप्रिल २०२० पासून केले जाईल , अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून प्रत्येक पात्र अंत्योदय आणि प्राधान्य रेशनकार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ शुक्रवार दि . १० एप्रिल २०२० पासून मोफत दिले जाईल.

हे धान्य एप्रिलसोबतच मे आणि जूनमध्ये सुद्धा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यासाठी अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी मुबलक स्वरूपात धान्य उपलब्ध असून त्याचे वाटप सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे एकूण ७ लाख ६३ हजार ३०५ रेशनकार्ड धारक आहेत. या लाभार्थ्यांना २ हजार ६०८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून आज नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ७० हजार ५७३ शिधापत्रिका धारकांना तब्बल ९६ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे ६१ हजार ९२५ क्विंटल गहू, ३३ हजार ९९० क्विंटल तांदूळ, तर ७६.७ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे १९ हजार ४२६ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे. त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.तसेच मे व जून महिन्यांतील मंजूर धान्य ज्या – त्या महिन्यात वाटप केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com