उपनगर : भाजीबाजारच्या बाजूकडील पंजाब चाळ समोर बाल संस्कार केंद्रात दिवसा जुगारी, मद्यपींचा अड्डा भरत असल्याचे चित्र आहे. यामुळे लहान मुलांवर घडविणाऱ्या बालसंस्कार केंद्राचा वापर मद्यपी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. यासाठी येथील नागरिकांनी मद्यपींवर कारवाईची मागणी केली आहे.
उपनगर मधील मनपाचा भाजीबाजार असून त्या समोर मनपाचे क्रीडांगण, वाचनालय, व्यायाम शाळा आणि स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्र आहे. या ठिकाणी अंगणवाडी देखील भरते. आजूबाजूच्या परिसरात अनेक नागरिक या ठिकाणी आपल्या पाल्यांना बाल संस्कार केंद्रात पाठवतात. तसेच वाचनालय, व्यायाम शाळा असल्याने वाचक, व्यायाम पटूची गर्दी होते. तसेच जेष्ठ नागरिकांचाही या ठिकाणी राबता असतो. परंतु हे बाळ संस्कार केंद्र सध्या मद्यपींच्या कचाट्यात सापडले आहे.
या बाल संस्कार केंद्रास प्रवेशद्वार नसल्याने गैरप्रकार करणाऱ्यांना आयती संधी सापडते. दिवसभर बाल संस्कार केंद्राच्या आवारात जुगारी डाव रंगवतात. मोबाईल वर पत्त्यांचा डाव, रोलेट खेळून सर्रास जुगार लावला जातो. काही अल्पवयीन तरुण यात ओढले जाऊन परिसरातील नवीन पिढीचे भविष्य अंधारात रुतत असल्याची चर्चा आहे. जुगार झाल्यानंतर येथे सायंकाळनंतर उघड्यावर ओल्या पार्ट्या रंगतात. यातून खून, दरोडे असे प्रकार घडविले जातात. विशेष म्हणजे याच्या अगदी मागे महाराष्ट्र हायस्कूल असून दिवसभर येथे विद्यार्थी, पालक यांची गर्दी असते.
उपनगर पोलिसांची गस्त असते, परंतु तिचा काहीच उपयोग होत नाही. पोलिसांची पाठ फिरली की लगेच जुगाऱ्यांचा अड्डा सुरू होतो. हप्तेगीरी मुळे जुगारी, मद्यपी चे फावले असल्याचे बोलले जात आहे. पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी येथे मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी परिसरातून होत आहे.
लोकप्रतिनिधी नावालाच का?
उपनगर मधील अंतर्गत महत्वाच्या भागात रोलेट जुगार अड्डा बिनदिक्कत पणे भरविला जातो. या परिसरात काही लोकप्रतिनिधी राहत असल्याने त्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिकांचा दबाव वाढल्यास थोडीफार कारवाई केल्याचा केवळ आव आणला जातो. याविरुद्ध कोणी लेखी तक्रार, निवेदन बाजी केल्यास घाबरविण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.