नाशिक : देशात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येकाने आपल्या घरात राहणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण यावर नियंत्रण मिळू शकतो. त्यामुळे बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला त्या क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती आपल्या घरातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ज्योत लावून आपल्या घरातच साजरी करावी,असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
दि.११ एप्रिल रोजी देशभरात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात होत असते. मात्र साऱ्या देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे. त्यामुळे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती घरातूनच साजरी करावी. कुणीही घराबाहेर पडू नये, आपल्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ आली. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली होती. सध्या देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशावर संकट ओढवले आहे. त्यामुळे देशभर लॉक डाउन आहे.
अशा परिस्थितीत आपल्याला मात्र कोणीही रुग्णांची सेवा करण्यास बाहेर पडा असे सांगत नाही तर आपण घरात रहा म्हणजे अपोआपच या आजाराला आपण दूर करू शकतो. त्यामुळे या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण आपण घरातच राहून करून त्यांना अभिवादन करावे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आपण त्यांचे विचार जोपासले जातील, असेही भुजबळ यांनी सांगितले.